‘आप’ने उपस्थितीत केला सवाल
प्रतिनिधी / मडगाव
आम आदमी पक्षाने राज्यातील वाढत्या कोळसा वापर व प्रदूषणाची दखल घेताना कोळसाविरोधी भूमिका घेतली आहे. आपचे म्हणणे आहे की, जगभरातील देश कोळशाचा वापर कमी करीत असताना गोवा सरकार मात्र कोळसा आयातीचा मार्ग मोकळा करण्यासाठी रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करीत आहे.
आम आदमी पक्षाचे नेते सिद्धार्थ कारापूरकर याविषयी बोलताना म्हणाले की, आम आदमी पक्ष सरकारला आव्हान देत आहे की, जो कोळसा प्रकल्प सरकार राज्यातील जनतेच्या माथी मारण्यासाठी आणत आहे. त्याचा जर राज्याला कुठलाही फायदा असेल तर सरकारने दाखवून द्यावे. ते पुढे म्हणाले की, पूर्वी काँग्रेसमध्ये असलेल्या आमदारांच्या मदतीने व समन्वयाने उभे असलेले सध्याचे सरकार जनतेचे शत्रू झालेले आहे. ‘पर्यावरणाचे रक्षण करण्याचा मुद्दा येतो, त्यावेळी जनतेचा कुठलाही कौल न मिळालेले हे सरकार एक वा दोन उद्योग समूहांना खुश करण्यासाठी राज्यातील लोकांशी अतिशय क्रूर पद्धतीने वागत असलेले पाहायला मिळत आहे. पण हे सहन करता कामा नये’ असे सिद्धार्थ यांनी म्हटले.
राज्यातील कोळशाच्या धंद्याला लुईझिन फालेरो यांच्याकडून प्रोत्साहन मिळाले आणि दुपदरीकरण अथवा डबल ट्रकिंग करण्याचा प्रस्ताव दिगंबर कामत यांच्याकडून पुढे रेटण्यात आला होता. ‘आप’ने नेहमीच म्हटले आहे का,r काँग्रेस आणि भाजप एक संयुक्त युती चालवीत असून या युतीचे नाव ’काँग्रेस जनता पार्टी’ असे आहे. आता नुकत्याच काही दिवसांपासून या प्रकल्पांबद्दल हृदयपरिवर्तन होऊन काँग्रेसकडून त्यांना विरोध होण्याचा प्रकार म्हणजे लोकांच्या डोळय़ात धूळ फेकण्याचा प्रकार होय. भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष गोवेकरांच्या भावनांशी खेळ करीत आहेत असे सिद्धार्थ यांनी यावेळी म्हटले.
काँग्रेसने कोळसा वाहतुकीला परवानगी दिली. वास्को व आसपासच्या परिसरातआजच्या घडीला फुफ्फुसांच्या आजारामुळे पीडित असलेल्या लोकांची संख्या 5 हजाराच्यावर असल्याची माहिती समोर आली आहे. हे असेच चालू राहिले तर अशी हजारोंनी जास्त प्रकरणे पुढे होऊ शकतात व हजारोंच्या संख्येने लोक याला बळी पडू शकतात.
आम आदमी पक्षाला नागरिकांच्या आरोग्याची काळजी आहे. सरकारने आता गोव्यातल्या लोकांचे आरोग्य आणि निसर्ग नष्ट करणे बंद केले पाहीजे असे श्री. कारापूरकर म्हणाले.
आता येऊ घातलेल्या रेल्वेच्या डबल ट्रकिंग वा दुपदरीकरणामुळे कोळसा वापर व वाहतूक भरमसाठ वाढेल, जास्त लोकांना स्वाभाविकरित्या त्याचा फटका बसेल. यामुळे संरक्षित असलेले जंगल नष्ट होईल. भगवान महावीर अभयारण्य, दूधसागर धबधबा, 100 हून जास्त प्राण्यांच्या प्रजाती या सर्व जैवविविध संपदेला त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो व ती नष्ट होऊ शकतात. झाडे आणि जलस्त्रोतही नष्ट होतील, हे वेगळे सांगायला नको.
कोळशापासून निर्माण केल्या जाणाऱया ऊर्जेचा वापर जगात आज कमी केला जात आहे. त्यामुळे पुनर्वापर करता येणारे ऊर्जास्त्रोत आपण यापुढे वापरूया, अशी भूमिका आम आदमी पक्षाने मांडली आहे.