मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत: सांखळी मतदारसंघात प्रत्येक पंचायतीत कार्यक्रम
प्रतिनिधी / सांखळी
राज्यसरकार सर्वांसाठी काम करत आहे. आपल्या राज्यात कोणीही व्यक्ती दु:खी राहू नये प्रत्येकजण आत्मनिर्भर होऊन चांगल्या कार्यात सहभागी होऊन राज्याच्या कामी यावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. प्रत्येक पंचायतीत स्वयंमित्रांची सोय करण्यात आली आहे त्याची मदत घेऊन आपल्या समस्या पंचायत सदस्यकडे मांडा आणि त्या सोडवून घ्या. आज सरकार तुमच्या दारी आले आहे त्याचा योग्य उपयोग करून घ्या, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
सुर्ला ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित सरकार तुमच्या दारी कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते.
यावेळी पाळी सरपंच शिवदास मुळगावकर, सुर्ला सरपंच विश्रांती सुर्लकर, वेळगे सरपंच सामंता कामत, कुडणे सरपंच राजन फाळकर,न्हावेली सरपंच कालिदास गावस,आमोणे सरपंच कृष्णा गावस आणि हरवळे सरपंच राजू मळीक आणि सर्व पंचायत सदस्य उपस्थित होते. राज्यात भाजप सरकार ‘सरकार तुमच्या दरी’ हा कार्यक्रम आयोजित करून सर्वांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहे. सांखळी मतदारसंघातील सर्व पंचायत कार्यालयात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी ‘सरकार तुमच्या दारी’ कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी आईपीएसअधिकारी तसेच सरकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि मार्गदर्शन केले.