गुहागरचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ गुहागर
शहरावर आलेले कोरोना संकट व त्यानंतर निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीवर सर्वांच्या एकजुटीमुळेंच नियंत्रण मिळवू शकलो असे मत नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी व्यक्त केले.
गरपंचायतीच्या वतीने नागरिकांना अर्सेनिक अल्बम गोळय़ा वाटप कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, कोरोनाची सुरूवात झाल्यानंतर शासनाच्या आदेशाची वाट न पाहता पहिल्या टप्प्यात नगरपंचायतीने बाहेर जिल्ह्यातून आलेल्या ग्रामस्थांना क्वारंटाईन करून घेतले. आजपर्यंत असे 803 लोक शहरात आले. यामधील 763जणांना होम क्वारंटाईन, तर 40जणांना स्वतंत्र जागेत विलगीकरण कक्षात ठेऊन 14 दिवसांच्या कालावधीनंतर घरी सोडण्यात आले. आज 136जण क्वारंटाईन आहेत. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यापासून दुर्गादेवी देवस्थान, व्याडेश्वर देवस्थान व दानशुर व्यक्ती, संस्था आदींची मदत घेऊन मास्क वाटप, फवारणी आदी आवश्यक सर्व कामे पूर्ण केली. सर्वांच्या सहकार्यामुळेच शक्य झाल्याचे बेंडल यांनी सांगितले.
होमीओपॅथी संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ. संदीप फुणगुसकर यांनी पहिल्या टप्प्यात या अर्सेनिक अल्बम गोळय़ांचे वाटप केले. यावेळी उपनगराध्यक्ष स्नेहा भागडे, नगरसेवक उमेश भोसले, अमोल गोयथळे, वैशाली मालप, सुजाता बागकर, माधव साटले, जसकरण मर्दा आदी उपस्थित होते.