प्रतिनिधी / म्हापसा
मृत्यूनंतर कुठल्याही प्रकरारचा भेदभाव न करता मृतदेहांना मुखाग्नी देण्यासाठी सज्ज असलेली गोमंतकातील एकमेव स्मशानभूमी अर्थातच कळंगुटातील श्रीदेव बाबरेश्वर मंदिराच्या परिसरात असलेले ‘मुक्तिधाम’ होय. येथे सर्व धर्म समभाव या उद्देशाने मग तो कोविड असो वा अन्य कोणी. कळंगूट येथील मुक्तिधाम स्मशानभूमीत सर्वांना अंत्यसंस्कार करण्यासाठी आम्ही जागा देतो. अशी माहिती कळंगूट श्री देव बाबरेश्वर देवस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत (चानू) चोडणकर यांनी तरुण भारतला दिली.
याबबात अधिक माहिती देताना ते म्हणाले की, पोर्तुगीज काळापासून हिंदू समाजातील मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी येथील समुद्र किनाऱयावरची जागा वापरात येत असे. दरम्यान या भागातील प्रसिद्ध भाटकार आलेक्स पिंटो यांनी स्थानिक हिंदूना अंत्यसंस्करावेळी होणारी अडचण लक्षात घेत तसेच त्यांच्या भावनांचा विचार करीत स्वतः पुढाकार घेतला आणि तत्कालीन पोर्तुगीज शासन काळातील जुंता-दी कर्मशियल या अधिकाऱयांशी बोलणी करून येथील नियोजित जागा स्थानिक हिंदूंच्या अंत्यसंस्कार कार्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी शब्द टाकला. यावेळी खोब्रावाडा-कळंगूट येथील दुकळे कुटुंबियांकडून येथील स्मशानभूमी जागेचा प्रश्न सातत्याने लावून धरला आणि त्याचा पाठपुरावा केल्यानेच सरतेशेवटी कळंगुटातील स्थानिक हिंदूंना स्मशानभूमी प्राप्त झाल्याचे या भागातील जुने जाणते नागरिक तथा सामाजिक कार्यकर्ते एकनाथ नागवेकर यांनी माहिती दिली.
कालांतराने येथील मक्तिधाम स्मशानभूमीचा ताबा स्थानिक पंचायतीकडे देण्यात आला व पंचायत मंडळाच्या आधारानेच टप्प्याटप्प्याने येथील स्मशानभूमीची दुरुस्ती तसेच सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात येते. सध्याच्या स्थितीत श्रीदेव बाबरेश्वर संस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत (चानू) चोडणकर तसेच देवस्थान समितीचे इतर सभासदांच्या सहकार्याने येथील स्मशाभूमीची यथायोग्य देखभाल घेतली जात आहे.
मुक्तिधाम स्मशानभूमीत सध्याच्या स्थितीत एकाचवेळी सहा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची सोय आहे. अशी माहिती बाबरेश्वर संस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत चोडणकर यांनी दिली.
श्री देव बाबरेश्वरच्या परिसरात अथांग सागराच्या निवांत सान्निध्यात वसलेल्या मुक्तिधामात हिंदू धर्मिय मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास जातात. अथवा प्रांत भेदाचा अडसर लागू होत नाही. या भागातील सूज्ञ, सुशिक्षित तसेच पुरोगामी विचारसरणीचा प्रभाव असलेल्या लोकांनळेच हे शक्य होत असल्याचे बाबरेश्वर संस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत चोडणकर यांनी सांगितले. त्याचप्रमाणे गोसावी समाजातील मृतदेहावर दफनविधी करण्यासाठी मुक्तिधामात अद्याप सोय करण्यात आली नसल्याची माहिती चोडणकर यांनी दिली. दरम्यान कोविड मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास मुक्तिधामात कुठलेही निर्बंध नसल्याने आतापर्यंत पाच ते सहा जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. कोविड मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर ही स्मशानभूमी पूर्णतः सॅनिटाईज केली जाते. अशी माहिती त्यांनी दिली. अलिकडेच या परिसरात दहाव्या व अकराव्या दिवसाची विधी करण्यासाठी खास शेडचा निवारा उभारण्यात आला आहे. तसेच त्याच्याबाजूला खास शौचालय व मुतारीचीही व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय अंत्यसंस्काराला लागणारी लाकडेही येथे उपलब्ध करण्यात आली आहेत.