फ्रान्सशी पेलेला करार पूर्ण, वायुदलाचे सामर्थ्य वाढणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
तीन अत्याधुनिक राफेल विमानांची शेवटची खेप भारताला मिळाली आहे. बुधवारी ही विमाने फ्रान्सहून भारतात आणण्यात आली. अशा प्रकारे आता भारताला सर्व 36 राफेल विमाने मिळाली असून फ्रान्सशी सात वर्षांपूर्वी झालेला यासंबंधीचा करार आता पूर्ण झाला आहे. या 36 पैकी 35 विमाने भारतात प्रत्यक्ष आणण्यात आली असून 1 विमान अद्याप फ्रान्समध्येच आहे. मात्र, ते भारतीय अधिकाऱयांच्या ताब्यात देण्यात आले आहे. राफेल विमानांमुळे भारताचे वायुदल अधिक सामर्थ्यसंपन्न झालेले आहे, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
2016 मध्ये फ्रान्सच्या देसाँ कंपनीशी हा करार करण्यात आला होता. 59 हजार कोटी रुपयांना भारत फ्रान्सकडून ही 36 विमाने तयार स्थितीत घेणार असे ठरले होते. त्याप्रमाणे पूर्तता करण्यात आली आहे. ही विमाने देसाँ कंपनीने तयार केली आहेत, तर त्यावरील अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणा एमबीएडी या युरोपियन कंपनीने निर्माण केली आहे. या करारात ऑफसेटचा मुद्दा महत्वाचा आहे.
अनेक अडथळय़ांनंतर यश
राफेल विमाने घेण्याचा निर्णय 2002 मध्येच झाला होता. तथापि, 2004 ते 2014 या दहा वर्षांच्या काँगेसप्रणित सरकारच्या काळात केवळ चर्चाच होत राहिली. निर्णय झालाच नाही. त्यामुळे भारतीय वायुदलाला अतिशय आवश्यक असणाऱया या विमानांची खरेदी लांबली. 2014 मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार स्थानापन्न झाल्यानंतर हा प्रश्न धसाला लावण्यात आला. 2016 मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या फ्रान्सच्या दौऱयात करार करण्यात आला.
सर्वोच्च न्यायालयात आक्षेप ही विमाने भारताला मिळण्यास सुरु झाल्यानंतर काही जणांनी सर्वोच्च न्यायालयात या व्यवहाराविरोधात याचिका सादर केली. या व्यवहारात भ्रष्टाचार झाला असून अनिल अंबानी यांच्या कंपनीचा हजारो कोटी रुपयांचा लाभ करुन देण्यात आला आहे, असा आरोप करण्यात आला. काँगेस नेते राहुल गांधी यांनी ‘चौकीदार चोर है’ ही घोषणा देत व्यवहार संशयास्पद ठरविण्याचा प्रयत्न केला. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने हे सर्व आरोप फेटाळले आणि व्यवहाराला मान्यता दिली. त्यानंतर विमाने भारतात येण्याचा मार्ग सुकर झाला.