मायावती यांची घोषणा- कुणासोबत आघाडीचा प्रश्नच नाही
वृत्तसंस्था/ लखनौ
बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी उत्तरप्रदेशातील सर्व 403 जागांवर स्वबळावर निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे. कुठल्याही पक्षासोबत बसप आघाडी करणार नाही. सत्तेवर आल्यावर सर्व घटकांची काळजी घेतली जाणार असल्याचे मायावती यांनी म्हटले आहे. केंद्र सरकार जातनिहाय जनगणनेच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. तर योगी आदित्यनाथ यांचे सरकार मुस्लिमांना सापत्न वागणून देत त्यांच्यात भीती निर्माण करत असल्याचा आरोप मायावती यांनी केला.
बसप स्वबळावर 403 जागांवर पूर्ण शक्तिनिशी निवडणूक लढणार आणि 2007 प्रमाणेच पूर्ण बहुमताने आमचा पक्ष सत्तेवर येणार आहे. कुणासोबत आघाडी करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे मायावती यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले आहे.
भाजपच्या राज्य सरकारमुळे मुस्लीम समाज दुःखी असून त्यांची प्रगती खुंटली आहे. बहुतांश बनावट प्रकरणांमध्ये गोवून मुस्लिमांचे शोषण करण्यात येतेय आणि नव्या नियमांच्या अंतर्गत मुस्लिमांमध्ये दहशत निर्माण केली जात आहे. हा प्रकार माझ्या सरकारच्या काळात कधीच घडला नव्हता असा दावा त्यांनी केला.
बसप सत्तेवर आल्यास मुस्लिमांसह जाट आणि ओबीसी समुदायांची प्रगती, कल्याण आणि सुरक्षा निर्धारित केली जाणार असल्याचे मायावती म्हणाल्या. मायावती यांनी मंगळवारी बसपच्या ओबीसी शाखेच्या वरिष्ठ पदाधिकाऱयांची बैठक बोलाविली होती.