वृत्तसंस्था/ मुंबई :
सध्या कोविड 19 ने जगभरात मोठय़ा प्रमाणात थैमान घातलेले आहे. यामुळे जगातील प्रमुख विषाणू संशोधन संस्था कोविडवर लस शोधण्याचा दिवसरात्र प्रयत्न करत असल्याचे मागील काही दिवसांपासून आपण पहात आहोत. मागील तीन चार महिन्याच्या प्रयत्नानंतर कोविडवरील लसीची चाचणी सकारात्मक होत असल्याच्या बातम्या येत आहेत आणि याचाच सकारात्मक परिणाम म्हणून जागतिक शेअर बाजाराचा कल तेजीकडे राहिला आहे. यामुळेच भारतीय शेअर बाजाराने तेजी प्राप्त केली आहे.
देशातील बाजारांमध्ये तेजीचे वातावरण राहिले आहे. यामध्ये व्यापक स्वरुपात झालेल्या लिलावामुळे सेन्सेक्स 429 अंकांनी वधारला आहे. याच दरम्यान दिवसभरातील कामगिरीच्या दरम्यान सेन्सेक्सने 600 अंकांचा उच्चांक गाठला होता. परंतु दिवसअखेर सेन्सेक्स 429.25 अंकांनी वधारुन निर्देशांक 35,843.70 वर बंद झाला तर दुसऱया बाजुला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 121.65 अंकांनी वधारुन निर्देशांक 10,551.70 वर बंद झाला.
चौथ्या दिवशी गुरुवारी सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये महिंद्रा ऍण्ड महिंद्राचे समभाग सर्वाधिक 6 टक्क्यांनी तेजीत राहिले आहेत. सोबत टायटन, एचसीएल टेक, टाटा स्टील, इन्फोसिस आणि टीसीएसचे समभाग नफ्यात राहिले आहेत. दुसरीकडे ऍक्सिस बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, कोटक बँक आणि भारती एअरटेलचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.
जर्मनीची बायोनटेक आणि अमेरिकेची फार्मा कंपनी फाइजर यांनी कोरोना विषाणूशी संबंधीत लस शोधण्याचा एकत्रित प्रयत्न सुरु केला आहे आणि यामध्ये सुरुवातीच्या काही चाचण्या या सकारात्मक आल्या आहेत. या बातमीमुळे आशियाई शेअर बाजारामध्ये तेजीचे वातावरण राहिले आहे. आगामी काळात घसरलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल अशी आशा सध्या तरी अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे.