शिवाजी हंडे यांचे प्रतिपादन : आंबेवाडीत श्री भाग्यलक्ष्मी सोसायटीचा रौप्यमहोत्सव साजरा
वार्ताहर /हिंडलगा
ग्रामीण भागात सहकारी संस्थांमुळेच गोरगरीब आणि गरजूना आर्थिक पाठबळ मिळाल्याने अनेकांचे स्वप्न साकार झाले आहे. पतसंस्थांनी माणसांचा आर्थिक दर्जा उंचावलेला आहे. ग्रामीण भागातील महिलांनी यामध्ये पुढाकार घेणे गरजेचे आहे. मात्र यासाठी कोणत्याही संचालकांना पैशाचा हव्यास असता कामा नये. जर निःपक्षपाती आणि पारदर्शक व्यवहार ठेवून कार्य केले तर ती संस्था खूप मोठी व्हायला वेळ लागणार नाही, आणि त्यामुळेच आज श्री भाग्यलक्ष्मी संस्था ही पंचवीस वर्षे पूर्ण केलेली संस्था असून या संस्थेचे कार्य उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन कॅपिटल वन सोसायटीचे चेअरमन शिवाजी हंडे यांनी व्यक्त केले.
आंबेवाडी येथील श्री भाग्यलक्ष्मी को-ऑप. सोसायटीच्या रौप्यमहोत्सवी समारंभानिमित्त ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गव्ह. कॉन्ट्रक्टर शिवाजी अतिवाडकर होते. यावेळी ते पुढे म्हणाले, सध्याच्या आधुनिक युगामध्ये आर्थिक राजकारणाची मोठी घोडदौड सुरू असून यामध्ये खूप मोठी प्रगती झालेली आहे. गुगल पे, फोन पे सारखा नव्या युगामध्ये नवनवीन तरुणांच्या हातामध्ये आज आपण आर्थिक उलाढाली बघत असतो. मात्र आर्थिक दर्जा उंचावण्याचे काम या सर्व ग्रामीण जगातील सहकारी पतसंस्थांनी केलेले आहे, असे मत व्यक्त करून संस्थेला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी लक्ष्मी प्रतिमेचे पूजन संस्थेच्या संचालिका प्रतिमा चौगुले आणि माधवी तरळे यांच्या हस्ते करण्यात आले. शिवमूर्ती पूजन सल्लागार सुनील राक्षे आणि पिराजी तरळे यांनी केले. तर दीपप्रज्वलन संस्थेचे संचालक अनिल अतिवाडकर, आनंद तुडयेकर, रुक्माण्णा कोवाडकर, संजय तरळे, मल्लेश लोहार आणि अर्जुन कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर भाग्यलक्ष्मी सभागृहाचे उद्घाटन चेअरमन गजानन घुग्रेटकर आणि व्हाईस चेअरमन सुभाष केदनुरकर यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी संस्थेचे सर्व माजी चेअरमन आणि माजी संचालकांचा संस्थेच्यावतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि संस्थेचे कर्मचारी वर्ग यांचाही सत्कार करण्यात आला.
तर उपस्थित मान्यवरांचा संस्थेच्यावतीने शाल, भगवा फेटा आणि पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. सर्व संचालकांचा गौरव केला. यावेळी संस्थेचे माजी संस्थापक चेअरमन राजू कोचेरी व गव्ह. कॉन्ट्रक्टर शिवाजी अतिवाडकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. माजी संस्थापक राजू कोचेरी, माजी व्हाईस चेअरमन परशराम तरळे, माजी चेअरमन कृष्णा होनगेकर, माजी संचालक कृष्णा काकतकर, माजी चेअरमन बाबुराव तरळे, माजी संचालक घळगु कांबळे, माजी सल्लागार भुजंगराव ढोपे, माजी संचालिका कल्पना तरळे, बसव्वा जंगम, गिरीजा आंबेकर, इंदू भांदुर्गे यांचाही शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन गौरव करण्यात आला.