सर्वसामान्य अडचणीत : अनेक जण रेशनपासून वंचित : तातडीने सुरू करण्याची मागणी
बेळगाव / प्रतिनिधी
गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ रेशनकार्डचे काम स्थगित झाल्याने सर्वसामान्य जनता अडचणीत आली आहे. नवीन रेशनकार्ड बनविणे व रेशनकार्डमधील दुरुस्ती ही सर्व कामे ठप्प झाल्याने अनेक गोरगरिबांना रेशनपासून वंचित राहावे लागत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढला आणि साधारण मार्चपासून या कामाला स्थगिती मिळाली आणि त्यानंतर आता अनलॉकच्या शिथिलतेनुसार सर्व काही सुरू झाले आहे. मात्र, रेशनकार्डचे काम बंदच असल्याने सर्वसामान्य अडचणीत आले आहेत. त्यामुळे रेशनकार्डचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी होत आहे. परिणामी गोरगरीब जनतेला रेशनबरोबर शासनाच्या अनेक सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे ठप्प झालेले रेशनकार्डचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी सर्वसामान्यांतून जोर धरत आहे.
शहरातील अशोकनगर, गोवावेस, रिसालदार गल्ली, टीव्ही सेंटर आदी ठिकाणी असलेल्या बेळगाव वन कार्यालयातून रेशनकार्डचे काम चालते. या कार्यालयात रेशनकार्डसह लाईट बिल, पाणी बिल, घरपट्टी यासह आधारकार्डचे काम सुरळीत सुरू असले तरी रेशनकार्डचे काम स्थगित झाल्याने नागरिकांची शासकीय कामे थांबली आहेत. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून या कामाला स्थगिती मिळाल्याने शासनाच्या सुविधांपासून वंचित राहावे लागले आहे. त्यातच आगामी काळात ग्राम पंचायत निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यास पुन्हा हे काम लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे आता तातडीने या कामाला सुरुवात करावी, अशी मागणी होत आहे.
गेल्या पाच महिन्यांपासून रेशनकार्डचे काम ठप्प झाल्याने चांगलीच गैरसोय होत आहे. परिणामी नागरिकांना कार्यालयात येऊन रेशनकार्डच्या कामाअभावी माघारी परतावे लागत आहे. आधीच नागरिक कोरोनाच्या संकटात सापडले आहेत. त्यातच रेशनकार्डचे काम स्थगित झाल्याने अनेकांना दर महिना मिळणाऱया रेशनपासून वंचित राहावे लागत आहे. शासकीय कामाबरोबर इतर कोणत्याही कामासाठी आधारकार्ड व रेशनकार्ड महत्त्वाचे आहे. त्यासाठी रेशनकार्ड काढण्यासाठी सर्वसामान्य नागरिक बेळगाव वन कार्यालयाच्या पायऱया झिजवत आहेत. ठप्प झालेले रेशनकार्डचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी सर्वसामान्यांतून जोर धरत आहे.