प्रतिनिधी /सांखळी
गोव्यात यंदा 2022 च्या विधानसभा निवडणुकीत चांगले मतदान झाले असून सांखळी मतदारसंघात सर्वाधिक मतदान झाले. याचे कारण सरकारी निवडणूक आयोगाने मतदान विषयी केलेली जागृती होय. मतदार केंद्र संख्या वाढवणे, प्रत्येक मतदान केंद्रावर नेमलेला स्थानिक अधिकारी, मतदार यादी वारंवार तपासणे आणि प्रत्येक पक्ष पातळीवर झालेले काम हे सांखळी मतदारसंघात सर्वाधिक कारण असू शकते, असे मत जाणकार व्यक्त करताना दिसत आहे.
सजवलेली मतदान केंद्र ही खास आकर्षण ठरली
सांखळी मतदारसंघात पन्नास मतदार केंद्रचे आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रत्येक केंद्रावर स्थानिक बीएलओ अधिकारी होते, त्यांनी आपआपली मतदान केंद्रावर खास आकर्षण सजावट केली होती. यंदा प्रथमच पर्यावरण पूरक वातावरण निर्मिती करण्यात आली होती. त्यामुळे मतदारांत उत्सवी वातावरण दिसत होते. लहान मुलांना ही मतदान केंद्रावर येण्यास आवड निर्माण झाली होती. सांखळी मतदारसंघातील पाळी, वेळगे, सुर्ल, आमोणे, कुडणे, न्हावेली, हरवळे, विर्डी, आणि सांखळी नगरपालिका क्षेत्रातही मतदार केंद्रावर खास सजावट पाहायला मिळाली.
मतदान वाढण्याचे श्रेय घेतात कार्यकर्ते
सांखळी मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत मोटय़ा प्रमाणात मतदान झाले असून याचे श्रेय भाजप आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते घेताना दिसत आहेत. आपण मतदारसंघात मतदान केंद्रावर आणल्या मुळेच मतदान वाढले असे भाजप कार्यकर्ते सांगतात. मतदारांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर राग असल्याने त्यांचा पाडाव करण्यासाठीच लोक मतदानास बाहेर पडले असल्याचे कॉग्रेस कार्यकर्ते सांगतात. मात्र मतदान केंद्रावर मतसंख्या वाढण्याचे खरे कारण निवडणूक आयोगाने केलेली जनजागृती होय असे सामान्य माणसाला वाटत आहे.