शाळा बंदच्या काळात चोरट्यांचा डल्ला
सांगरूळ / प्रतिनिधी
करवीर तालुक्यातील सांगरुळ येथील कुमार विद्या मंदिर मधील चार एलईडी टी व्ही संच आणि स्टेरिओ बॉक्स असा सुमारे सव्वा लाखाचा ऐवज चोरीला गेला आहे. शाळेतील वर्गाच्या खोलींचे कुलूप न तोडता चोरट्यांनी चोरी केली आहे. मुख्याध्यापक रघुनाथ निवृत्ती बाटे यांनी करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
प्रत्यक्ष घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सांगरुळच्या दक्षिण बाजूस मरगाईचा माळ या भागात कुमार विद्या मंदिर सांगरूळ या शाळेची इमारत असून शाळेच्या सभोवताली आरसीसी संरक्षक भिंत आहे. शाळेच्या सभोवताली लोकवस्ती व प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.कोरोना महामारीमुळे शाळा मार्च अखेर पासून बंद आहेत. या काळात या शाळेच्या इमारतीचा वापर अलगीकरण कक्ष म्हणून केला होता. १५ ऑगस्ट २०२० रोजी ध्वजारोहण निमित्त शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शाळेमध्ये आले होते. यावेळी एलईडी टीव्ही संच व साऊंड सिस्टिम शाळेत सुस्थितीत होते. सदर एलईडी टीव्ही संच ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगातून सन २०१८ – १९ व २०१९ – २० या सालात शाळेला ई लर्निंग शैक्षणिक साहित्य म्हणून दिले होते .
१२ डिसेंबर २०२० रोजी करवीर पंचायत समितीमध्ये मुख्याध्यापकांची बैठक बोलावून शाळा सुरू करण्याबाबत शाळांचीची तयारी करावी अशा सूचना दिल्याने १५ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शाळेत आले असता चारही वर्गातील एलईडी टीव्ही संच व ऑफिस मधील साऊंड सिस्टिम गायब झाल्याचे लक्षात आले. ऑफिस खोलीचे कौलांची मोडतोड केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मुख्याध्यापक रघुनाथ बाटे यांनी याबाबत शाळा व्यवस्थापन समितीला दिली यानुसार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी नाळे,उपाध्यक्ष तुळशीदास कांबळे ,यांचे सह सर्व सदस्यांनी शाळेत जाऊन पाहणी केली व ग्रामपंचायत प्रशासनाला माहिती दिली. सरपंच सदाशिव खाडे, उपसरपंच सुशांत नाळे ,ग्राम विकास अधिकारी पी एम बिडकर यांनी यांचे सह सदस्यांनी शाळेत जाऊन पाहणी केली .यानुसार मुख्याध्यापक रघुनाथ बाटे यांनी करवीर पोलीस स्टेशन मध्ये शाळेतील चोरीबाबत अज्ञाता विरोधात तक्रार दाखल केली .करवीर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे .
चोरीबाबत संभ्रमावस्था
चोरट्यांनी वर्ग खोल्यांच्या दारांची किंवा कडी-कोयंडेची मोडतोड न करता चारही खोलीतील टीव्ही संच चोरले आहेत .चोरीबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे .चोरट्यांनी ऑफिस खोलीवरील कौले काढून खोलीत प्रवेश करून वर्गखोल्यांच्या चाव्या घेतल्या असाव्यात आणि आणि सर्व वर्गांचे कुलूप काढून चोरी करून पुन्हा सर्व वर्गांची कुलपे पूर्ववत बंद करून चाव्या ऑफिसमध्ये पूर्ववत ठिकाणी ठेवल्या असाव्यात असा संशय व्यक्त केला जात आहे.
समाजातील भिन्न प्रवृत्ती
प्राथमिक शाळातील विद्यार्थ्यांना स्मार्ट शिक्षण मिळावे म्हणून ग्रामपंचायतीच्या १४ वा वित्त आयोगमधून शाळाना ई लर्निंग साहित्य दिले जाते .अनेक दानशूर लोकांच्या लोकवर्गणीतूननही असे ई-लर्निंग साहित्य प्राथमिक शाळांना मोठ्या आपुलकीने दिले जाते . शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा म्हणून पदरमोड करणारे एकीकडे व चैनीसाठी असे शैक्षणिक साहित्याची चोरी करणारे दुसरीकडे अशा भिन्न प्रवृत्ती मानव जातीच्या एका समाजामध्ये आहेत .याची चर्चा नागरीकातून होत आहे.