प्रतिनिधी / सांगली
एनटीएच्यावतीने देशामध्ये घेतली जाणारी नीटची परीक्षा सांगली जिल्ह्यातून दहा हजारापेक्षा जास्त मुले देतात. या सर्व मुलांना जवळपासच्या जिल्ह्यांमध्ये परीक्षेकरीता जावे लागते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व जिल्ह्यातील परिक्षार्थींची संख्या पाहता सांगलीमध्ये नीट परीक्षेचे केंद्र करावे अशी मागणी जिल्हा सुधार समितीचे अध्यक्ष ॲड. अमित शिंदे यांनी केली आहे.
याबाबत बोलताना ॲड. अमित शिंदे म्हणाले की, एनटीच्या वतीने देशामध्ये नीटच्या परीक्षा घेतल्या जातात. एमबीबीएस, बीडीएस सोबतच आयुष कोर्सेस, व्हेटरनरी च्या संपूर्ण देशांतील १५ टक्केचा कोटा त्याचसोबत शासकीय, अनुदानित व खाजगी महाविद्यालयातील बीपीटिएच, बीपीओ, बीएएसपीएल, बीएससी नर्सिंगच्या प्रवेशासाठी नीट परिक्षा देणे आवश्यक आहे.
सन २०२० मध्ये महाराष्ट्रातून २,२८,९१४ मुलांनी ही परिक्षा दिली होती. सांगली जिल्ह्यामध्ये ८ इंजिनियरिंग, ३ एमबीबीएस, २ बीडीएस, ३ बीएएमएस, ३ बीएचएमएस तसेच फार्मसी, आर्किटेक्चर महाविद्यालये आहेत. अनेक महत्त्वाच्या परिक्षा सांगली जिल्ह्यामध्ये घेतल्या जातात. सांगली जिल्ह्यात १४८ महाविद्यालये असूनही जिल्ह्यातील विद्यार्थांना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये परिक्षेस जावे लागते. कोरोनामुळे मागील वर्षी अनेक विद्यार्थ्यांना परिक्षा देताना अडचणी आलेल्या होत्या. यावर्षी जिल्ह्यातून दहा हजारपेक्षा जास्त विद्यार्थी या परिक्षेस बसतील असा अंदाज आहे. तसेच सांगली शेजारील कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा विचार केला असता जवळपास वीस हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांसाठी सांगली हे केंद्र सोयीचे ठरणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.