मारहाण झाल्याने निर्णय : दोन दिवसात कारवाई न झाल्यास जिल्हाभर काम बंद आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी / सांगली
तीन तलाठ्यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ इस्लामपूर प्रांताधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करण्यास वाळवा इस्लामपूर उपविभागातील तलाठी सर्कल यांनी नकार दिला आहे. गुरूवारपर्यंत या प्रकरणाची चौकशी करून कारवाई न केल्यास जिल्हाभर कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
इस्लामपूरचे वादग्रस्त प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी सोमवारी रात्री आठ वाजल्यानंतर अविनाश पाटील, महादेव वंजारी आणि अमर साळुंखे यांना कार्यालयात बालावून घेऊन अर्वाच्च शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्यावतीने या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. जिल्हा संघटनेचे अध्यक्ष विजय तोडकर, परशुराम ओमासे, सुहास औताडे, कबीर सूर्यवंशी, संजय पाटील, प्रभाकर जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले.
वाळवा इस्लामपूर उपविभागीय अधिकारी नागेश पाटील यांनी पूर्वग्रह दूषित हेतूने तिघा तलाठयांना कार्यालयात बोलावून मारहाण केली आहे. ही घटना महसूल खात्याला काळीमा फासणारी आहे. या घटनेमुळे वाळवा इस्लामपूर उपविभागातील तलाठी,सर्कल प्रचंड तणावाखाली आहेत. उद्यापासून या प्रांतांच्या हाताखाली काम न करण्याचा निर्णय संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे. येत्या 18 मार्चपर्यंत या प्रकरणाची चौकशी करून प्रांताधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास जिल्हाभर काम बंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. जोपर्यंत प्रांताधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही. तोपर्यंत आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
चौकशी समिती नियुक्ती होणार या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी समिती नियुक्तीचे आश्वासन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे. या समितीमार्फत चौकशी करून येत्या 48 तासात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अहवाल येताच शासनाकडे कारवाईसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आश्वासनही संघटनेला जिल्हाधिकाऱयांनी दिले असल्याचे सांगण्यात आले. |