चार जणांवर फौजदारी, तर ग्रामविकास अधिकाऱ्याची होणार खातेनिहाय चौकशी
प्रतिनिधी / मिरज
एरंडोली (ता. मिरज) ग्रामपंचायत मधील चार कर्मचाऱ्यांविरुध्द अपहार प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. यामध्ये एका महिला कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. घरपट्टी, पाणीपट्टीसह अन्य कर वसूलीमधील सुमारे 2 लाख, 73 हजार, 75 रुपयांच्या अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दरम्यान, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी एस. बी. विटेकर यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. पंचायत समिती प्रशासनानेही कर्मचाऱ्या विरुध्द गुन्हा दाखल करण्याचे आदेश ग्रामविकास अधिकाऱ्यांस दिले आहेत.
फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये शिपाई गोपाळ विलास वाघमारे, लिपिक दिपक एकनाथ खांडेकर, पाणी पुरवठा कर्मचारी श्रीमती भारती भानूदास सुर्यवंशी आणि अभिजीत प्रल्हाद धेंडे यांचा समावेश आहे. आज बुधवारी गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांनी अपहार प्रकरणी संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश ग्रामविकास अधिकारी एस. बी. मुलाणी यांना दिले.