आमदार विक्रम सावंत, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील यांची नावे चर्चेत : महाराष्ट्र प्रभारींकडून चाचपणी
प्रतिनिधी / सांगली :
काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. या पदासाठी जिल्हÎातील जतचे युवा आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यासह विशाल पाटील आणि विद्यमान शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील या युवा नेत्यांची नावे आघाडीवर आहेत. महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडून या नावांची चाचपणी करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागूल राहिले आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी सर्व निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर करुन आघाडीमध्ये खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या वक्तव्याने तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यात आघाडी असली तरी पक्ष बळकट करण्यासाठी पटोले यांनी राज्यभर दौरे सुरु केले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व अन्य निवडणुकांमध्ये पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी तसेच कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दूर करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत.
ज्या जिह्यात पक्षाचे संघटन कमकुवत आहे. त्या जिह्यामध्ये पुन्हा कार्यक्षम फळी निर्माण करण्यावर भर दिला जात असून युवा नेत्यांची निवड केली जाणार आहे. राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरुन या निवडीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे. दरम्यान ग्रामीण जिल्हाध्यक्षपदासाठी अनेक नावे चर्चेत आहेत. जतचे युवा आमदार आणि कदम घराण्याचे स्नेही विक्रमसिंह सावंत यांचे नाव आघाडीवर आहे. दादा घराण्याचे धडाडीचे युवा नेते तथा वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, काँग्रेसचे विद्यमान शहरजिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील ही या शर्यतीमधील प्रमुख नावे आहेत.
काँग्रेसचे राज्य प्रभारी एच. के. पाटील यांनी स्वतः सांगलीतील प्रमुख कार्यकर्त्यांना संपर्क साधून जिल्हाध्यक्षपदासाठी चाचपणी सुरु केली आहे. सद्यस्थितीमध्ये आमदार सावंत आणि दोन पाटलांमध्येच जोरदार चुरस असल्याची चर्चा आहे. आमदार सावंत यांनी जत तालुक्यांवर पंधरा वर्षे दबदबा निर्माण करणाऱया भाजपच्या विलासराव जगताप यांचा मोदी लाटेतही दारुण पराभव केला आहे. युवकांमध्ये त्यांच्याबद्दल एक वेगळे आकर्षण आहे. तर दुसरे दावेदार विशाल पाटील हे दादा घराण्याचे वारसदार आहेत. त्यांनी जिल्हÎात संपर्क वाढवला आहे. विविध सामाजिक उपक्रमांतून संघटन मजबूत करण्यांवर भर दिला आहे.
शहर काँग्रेसचे विद्यमान शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वराज पाटील यांनी गेल्या काही वर्षामध्ये चांगली कामगिरी केली आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजय थोडक्यात हुकला होता. महापालिका क्षेत्रात काँगेस जिवंत ठेवण्याचे काम पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे. सर्व गटांना बरोबर घेऊन अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यावर त्यांनी भर दिला आहे. त्यामुळे तिघांपैकी कोणाच्या गळ्यात ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची माळ पडणार याकडे तमाम काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.