महिलांनी आरडाओरड केल्यानंतर वस्तीवरील ग्रामस्थांनी कोल्ह्यास केले ठार
वार्ताहर / आष्टा
वाळवा तालुक्यातील बहादूरवाडी येथे कोल्ह्याने चार महिलांसह पाच जणांवर हल्ला करुन जखमी केले. दरम्यान ग्रामस्थांनी या कोल्ह्यास ठार केले. बुधवारी सकाळी पावणे सहा वाजता ही घटना घडली.
बहादूरवाडी-कणेगाव रस्त्यावर पीर बद्रुद्दीन समाधीजवळील वस्तीत ही घटना घडली. बुधवारी सकाळी ऊसाच्या फडातून कोल्हा बाहेर आला. यावेळी काही महिला जनावरांना चारा आणण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. तर काही महिला जनावरांचे दूध काढण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. यावेळी अचानक येवून कोल्ह्याने त्यांच्यावर हल्ला चढविला. काही महिलांच्या तोंडाला, पायाला, हाताला चावा घेतला. तर एका पुरुषाचाही चावा घेतला.
पांडूरंग कृष्णा देसावळे, रेखाताई पांडूरंग देसावळे, शेवंता पिराजी खोत, सीमा अमोल देसावळे, उषा दिलीप खोत अशी या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्यांची नावे आहेत. यावेळी पांडूरंग देसावळे यांचे हाताचे एक बोट तुटले, तसेच ओठावर आणि चेहऱ्यावर गंभीर चावा घेतला आहे. शेवंता खोत यांच्या चेहऱ्यावर आणि हाताला गंभीर जखमा झाल्या आहेत. उषा खोत यांच्या नाकाचा शेंडा तुटला आहे. रेखाताई देसावळे यांचा कोल्ह्याने ओठ तोडला आहे.
यावेळी महिलांनी आरडाओरड केल्यानंतर वस्तीवरील ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी काठी व दगडाच्या सहायाने कोल्ह्यावर हल्ला चढवून ठार केले. त्यानंतर चार महिला व एका जखमी पुरुषास उपचारासाठी सांगली सिव्हील रुग्णालयात दाखल केले. या घटनेने बहादूरवाडी परिसरात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान घटनास्थळी पोलिस पाटील ज्ञानेश्वर चांदणे यांनी भेट देवून पाहणी केली.