प्रतिनिधी / सांगली
पारदर्शी कारभाराचा डांगोरा पिटणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गेल्या पाच वर्षाच्या कालावधीतील कारभाराची अप्पर आयुक्तांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाने बँकेने केलेली नोकरभरती, कोट्यावधीचे संगणक खरेदी टेंडर प्रक्रिया, कर्जवाटप आदी कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. प्रत्यक्ष चौकशी अहवाल आल्यानंतर सर्वकाही स्पष्ट होणार असले तरी सध्यस्थितीत बँकेच्या कारभाराबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
स्वतंत्र भारत पक्षाचे सरचिटणीस सुनील फराटे यांनी जिल्हा बँकेतील गेल्या पाच वर्षाच्या कारभारात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत विभागीय सहकार आयुक्तांकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची गंभीरपणे दखल घेतली असून विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांनी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
पारदर्शी कारभाराचा होणार पर्दाफाश
या चौकशीमध्ये बँकेत केलेली नोकरभरती, फर्निचर मालमत्ता खरेदी, बोगस कर्जवाटप, टेक्नीकल पदाची भरती, संगणक खरेदी, वाढलेला एनपीए, फिट ऍण्ड प्रॉपर क्रायटेरियानुसार अपात्र कार्यकारी संचालकांची नियुक्ती, 70 कोटीचे कर्ज राईट ऑफ करणे आदी कारभाराची चौकशी होणार आहे. चौकशीनंतर खरेखोटे बाहेर येईल, सध्यस्थितीत मात्र विद्यमान संचालक मंडळाने गेल्या पाच वर्षात केलेल्या कारभाराबाबत संशय निर्माण झाला असून पारदर्शी कारभाराचा आव आणून डांगोरा पिटणाऱया कारभाऱयांबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.
सर्वसामान्यांना कर्जवाटप करताना नियमावर बोट ठेवणाऱ्या बँकेने धनदाडंग्यांना नियमबाह्य कर्जवापट केल्याची तक्रार आहे. एका नेत्याच्या नियोजित कारखान्यासाठी कोटÎवधीचे कर्ज दिले आहे. दमबाजी करणाऱ्यांचे आणि बड्यांचे 70 कोटीचे कर्ज राईट ऑफ केले आहे. कोरम नसताना दमात घेतल्यानंतर एनओसी दिली. सुमारे 32 कोटीचे कर्ज दिले. विशेष म्हणजे पहिली कोट्यावधींची थकबाकी असताना बँक या नेत्यांवर उदार झाली आहे. नियमानेच काम करीत असल्याचा आव आणणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचीच नियुक्ती वादत सापडली आहे. त्यांचे फिटनेस सर्टीफिकेटच अपात्र असताना त्यांची नियुक्ती कोणी आणि कशासाठी केली, यामागे कोणाचा दबाव होता, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
सोसायट्यांना संगणक देण्यात येणार आहे. यासाठी ठराविक कंपनीला कोट्यावधीचे टेंडर मिळावे यासाठी किचकट कागदपत्रांच्या अटी कशासाठी घातल्या, सर्वात महत्वाचे म्हणजे बँकेत पाचशे कर्मचाऱ्यांची नोकरभरती केली आहे. या भरतीतील कारभार वर्षभर चर्चेत आहे. एका कंपनीमार्फत ही प्रक्रिया राबविली गेली. कंपनीला मॅनेज करून भरती प्रक्रिया कागदोपत्री पार पाडली. यामध्येही अनेकजण मालामाल झाल्याच्या तक्रारी आहेत. बँकेच्या कारभाराबाबत फराटे यांच्या तक्रारीनंतर चौकशी सुरू झाल्याने कारभाऱ्यांची झोप उडाली आहे. आता चौकशी पारदर्शी झाली तर काहीतरी कारभारातील गडबड बाहेर येणार अशीच चर्चा सुरू झाली असल्याने कारभारी गॅसवर आले आहेत.