प्रतिनिधी / सांगली
जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे सांगली जिल्ह्यात शेतीचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून जिल्ह्यात महापूरामुळे बाधित झालेल्या 5 तालुक्यातील 202 गावांमधील आतापर्यंत 51 हजार 372 शेतकऱ्यांच्या 18 हजार 286 हेक्टर जमीनींचे पंचनामे पुर्ण झाले आहेत. उर्वरित शेतीचे पंचनामे युध्दपातळीवर पुर्ण करण्यासाठी यंत्रणा गतीने कार्यरत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले आहे.
जिल्ह्यात महापुरामुळे तसेच अतिवृष्टीमुळे, ओढ्यांना जादा पाणी आल्याने मिरज, वाळवा, पलूस, तासगाव व शिराळा या पाच तालुक्यातील 247 गावे बाधित झाली आहेत. शासन निर्देशानुसार बाधित गावातील नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे युद्धपातळीवर करण्यात येत आहेत.
मिरज तालुक्यातील 26 गावे बाधित झाली असून त्यापैकी 23 गावांतील 11 हजार 52 शेतकऱ्यांचे 4 हजार 747.94 हेक्टरचे प्रत्यक्ष पंचनामे पुर्ण झाले आहेत.
- वाळवा तालुक्यातील 98 गावे बाधित झाली असून त्यापैकी 59 गावांतील 17 हजार 440 शेतकऱ्यांचे 6 हजार 727.04 हेक्टरचे प्रत्यक्ष पंचनामे पुर्ण झाली आहेत.
- शिराळा तालुक्यातील 95 गावे बाधित झाली असून त्यापैकी 95 गावांतील 14 हजार 859 शेतकऱ्यांचे 3 हजार 23.53 हेक्टरचे प्रत्यक्ष पंचनामे पुर्ण झाली आहेत.
- पलूस तालुक्यातील 26 गावे बाधित झाली असून त्यापैकी 23 गावांतील 7 हजार 950 शेतकऱ्यांचे 3 हजार 755.75 हेक्टरचे प्रत्यक्ष पंचनामे पुर्ण झाली आहेत.
- तासगाव तालुक्यातील 2 गावे बाधित झाली असून तेथील 71 शेतकऱ्यांचे 32.92 हेक्टरचे प्रत्यक्ष पंचनामे पुर्ण झाली आहेत.