प्रतिनिधी / सांगली
जिल्हय़ात रविवारी प्रथमच नवीन रूग्णसंख्येपेक्षा कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या दुप्पट आहे. रविवारी नवे 131 रूग्ण वाढले तर तब्बल 272 जण कोरोनामुक्त झाले आहेत. ही अत्यंत दिलासा देणारी गोष्ट जिल्हय़ासाठी घडली आहे. पण उपचार सुरू असताना 12 मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 11 जण जिल्हय़ातील आहेत तर एकजण परजिल्हय़ातील आहे. आजअखेर जिल्हय़ात 320 जणांचा बळी गेला आहे.
महापालिका क्षेत्रात 69 नवीन रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्राला गेल्या पंधरा दिवसानंतर प्रथमच दिलासा मिळाला आहे. पंधरा दिवसांत दररोज सरासरी 150 पेक्षा अधिक रूग्ण वाढलेले होते. पण रविवारी मात्र फक्त 69 रूग्ण वाढले आहेत. यातील सांगलीत 36 आणि मिरजेत 33 रूग्ण वाढले आहेत. सांगली शहरात वाढलेले रूग्ण हे खणभाग, गावभाग, विश्रामबाग, हनुमाननगर, शंभरफुटी, हरीपूर रोड, बायपास रोड तसेच संजयनगर या परिसरातील आहेत. तर मिरज शहरात 33 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये गावठाणमधील काही व उपनगरातील काही रूग्ण आहेत. सांगली महापालिका क्षेत्रात आजअखेर चार हजार 965 रूग्ण झाले आहेत. महापालिकेने रूग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी नानाविद्य उपाययोजना केल्या आहेत. या उपाययोजनेला आता यश मिळण्याची शक्यता लाभत आहे.
ग्रामीण भागात 62 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्राप्रमाणेच ग्रामीण भागालाही रविवारी दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागातही सातत्याने 120 ते 150 या सरासरीने रूग्ण वाढत होते. पण रविवारी मात्र फक्त 62 रूग्ण वाढले आहेत. यामध्ये आटपाडी तालुक्यात सहा, जत येथे सहा आणि कडेगाव तालुक्यात एक रूग्ण वाढला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात रविवारी एकही रूग्ण आढळून आला नाही. खानापूर तालुक्यात दोन, मिरज तालुक्यात 14 तर पलूस तालुक्यात तीन नवीन रूग्ण आढळले आहेत. शिराळा तालुक्यात पाच, तासगाव तालुक्यात सात आणि वाळवा तालुक्यात सर्वाधिक 18 नवीन रूग्ण वाढले आहेत.
जिल्हय़ातील 11 जणांचा मृत्यू
जिल्हय़ात रविवारी 11 जणांचा कोरोनाचे उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहरातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये विजयनगर येथील 80 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात 71 वर्षीय व्यक्तीचा विवेकानंद रूग्णालयात गावभाग येथील 102 वर्षीय व्यक्तीचा सेवासदन हॉस्पिटल येथे तर 65 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पलूस तालुक्यातील दुधोंडी येथील 58 वर्षीय महिलेचा कोरोना रूग्णालयात मृत्यू झाला.कवठेमहांकाळ तालुक्यातील हिंगणगाव येथील 52 वर्षीय व्यक्तीचा घाटगे हॉस्पिटल येथे तर रांजणी येथील 75 वर्षीय महिलेचा वानलेस हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. मिरज तालुक्यातील मालगाव येथील 50 वर्षीय महिलेचा वानलेस हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. अंकली येथील 99 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. कडेगाव तालुक्यातील अंबक येथील 54 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटल येथे तर कडेगावातील आझादनगर येथील 70 वर्षीय महिलेचा भारती हॉस्पिटल येथे मृत्यू झाला आहे. जिल्हय़ात रविवारी 11 जणांचा मृत्यू झाल्याने आजअखेर जिल्हय़ातील 320 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.
परजिल्हय़ातील एकाचा मृत्यू
जिल्हय़ात उपचार सुरू असणाऱया कोल्हापूर जिल्हय़ातील पन्हाळा येथील 55 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात मृत्यू झाला आहे. त्यामुळे परजिल्हय़ातील आजअखेर 86 जणांचा मृत्यू झाला आहे.
विक्रमी 272 जण कोरोनामुक्त
रविवारी जिल्हय़ात प्रथमच नवीन कोरोना रूग्णापेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या दुप्पटीने अधिक आहे. जिल्हय़ात रविवारी विक्रमी 272 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे जिल्हय़ात आजअखेर पाच हजार 40 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. कोरोनामुक्त रूग्णांची वाढलेली संख्या जिल्हय़ाला दिलासा देणारी गोष्ट ठरत चालली आहे.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 8443
बरे झालेले 5040
उपचारात 3083
मयत 320