प्रतिनिधी / सांगली
सन २००५ व २०१९ च्या महापूरांची पुनरावृत्तीच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याने नागरिकांना मनपा प्रशासनातर्फे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. पण ही यंत्रणा तोकडी पडू नये, म्हणून अनेक नगरसेवक, सामाजिक संघटना व त्यांचे कार्यकर्ते यांनी युद्धपातळीवर मदत सुरु केली आहे. सांगलीकरांच्या मदतीसाठी अनेक मदतीचे हात सरसावले आहेत.
सध्या महापुराचा विळखा काकानगर, कर्नाळ रोड, जामवाडी परिसर, हरिपूर रोड, पाटणे प्लॉट, भारत नगर, रामनगर, शामराव नगर आदींसह विविध भागांना पडण्यास सुरुवात झाली आहे. पाण्यात थोडी वाढ होत असल्याने येथील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे काम मनपा प्रशासनातर्फे सुरु आहे. त्याचबरोबर अनेक नागरिकांसह विविध सामाजिक संस्था, प्रभागातील नगरसेवक यांनीही मदतीचा हात पुढे केलेला दिसून येत आहे. यामध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे शेखर माने, नगरसेवक उत्तम साखळकर, पृथ्वीराज पवार, उर्मिला बेलवलकर, भारती दिगडे, युवराज बावडेकर सुब्राव मद्रासी, हरिदास पाटील, अस्लम कोथळी, अॅड. अमित शिंदे, मुस्तफा मुजावर, संजय चव्हाण यांच्यासह शहरातील विविध नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते पुरग्रस्त भागात पोहोचून सांगलीकरांच्या व्याथा जाणून घेत आहेत.
स्थलांतराबरोबरच भोजन व्यवस्था जुने कपडे आदी सहाय्य करुन पूरग्रस्त लोकांना धीर देण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. सांगलीकरांच्या संकट काळात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या विविध सामाजिक संघटनाही पूरग्रस्त लोकांसाठी धावून येत आहेत. सावली बेघर निवारा केंद्र, क्रीडाई संस्था, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, जिव्हाळा फौंडेशन, डॉल्फिन ग्रुप, निर्धार संघटना, नटराज फाँडेशन, निसर्गरंग फौंडेशन, फ्युजन डान्स अकॅडमी, शिवप्रतिष्ठान, युवा शिवप्रतिष्ठान, जिविका फौंडेशन आदींसह शहरातील अनेक सामाजिक संघटना पूरग्रस्तांसाठी सज्ज झाल्या आहेत. तसेच पट्टीचे पोहणारेही मदतीसाठी धावून येत आहेत.