प्रतिनिधी/सांगली
पूर बाधित गावांना जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा परिषद यांच्यावतीने पंधरा बोटी देण्यात आल्या. आज, रविवारी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत या बोटी संबंधित पूर बाधित गावांना प्रदान करण्यात आल्या.
गतवर्षी आलेल्या महापुरामुळे प्रथमच बोटींची आवश्यकता प्रकर्षाने जाणवली. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीमधून 22 गावांना सुसज्ज फायबर बॉडी देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर्षी दुर्दैवाने महापुराचे संकट आलेच तर त्याचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. कर्नाटक सरकार बरोबर चांगला समन्वय आहे. तसेच सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळी वरही ही नजर ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे यावर्षी नदीकाठच्या गावांना फार मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागणार नाही असा विश्वास, पालकमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
तर या बोटींची देखभाल आणि दुरुस्तीसाठी संबंधित ग्रामपंचायतींना सूचना देण्यात आलेल्या आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी यावेळी दिली. कार्यक्रमास आमदार सुधीर गाडगीळ आमदार सुरेश खाडे ,आमदार मानसिंगराव नाईक यांच्यासह सहा प्रमुख लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.