वार्ताहर / बागणी
फाळकेवाडी येथील तलाठी व्ही. टी. गुरव व कोतवाल शिवाजी जाधव हे आपत्ती व दक्षता कमिटीचे सदस्य आहेत. हे कोरोना काळातील कोणत्याही उपाय योजनेत सहभागी होत नाहीत. नेहमी गैरहजर असतात. वारंवार सूचना देऊन देखील त्यांनी सोयीस्कर पणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी अध्यक्ष व इतर सर्व सदस्य यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
फाळकेवाडी, चंदवाडी, चांदोली वसाहत येथे कोरोना पेशंट दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळे शासनाच्या वतीने आयोजित सर्व उपाय योजना राबविण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन सतर्क राहून काम करत आहे. पण तलाठी व्ही. टी. गुरव व कोतवाल शिवाजी जाधव यांनी मात्र फाळकेवाडी गावाकडे पाठ फिरवली आहे. शासनाच्या कोणत्याची उपाय योजनेत ते सहभागी झालेले दिसून येत नाहीत. ४ मे मंगळवारी सर्व सदस्य, तलाठी, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांना बोलावून घेऊन गावातील वाढत्या पेशंट बाबत कठोर अंमलबजावणी करण्यासाठी मिटिंग बोलावली होती.
सर्वांना सांगून देखील तलाठी व कोतवाल हे उपस्थित राहिले नाहीत. यापूर्वी देखील उडवा उडवीची करणे देत त्यांनी गैरहजेरी लावली आहे. त्यामुळे या तलाठी व कोतवाल यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी मागणी कमिटीचे अध्यक्ष व सर्व सदस्य यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.