वार्ताहर / बोरगाव
वाळवा तालुक्यातील बोरगाव गावचे सुपुत्र व नागपूर विभागातील वनक्षेत्रपाल पांडुरंग शिवाजीराव पाखले यांना २०१८-१९ च्या वन व वन्यजीव संरक्षणाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने सुवर्णपदक जाहीर केले आहे. त्यामुळे बोरगावच्या नावलौकिकात मानाचा शिरपेच रोवला आहे.
पाखले यांनी गेल्या ५ वर्षात वनसंपत्तीचे संरक्षण व वन्यजीव संवर्धन याबाबत गोरेवाडा प्रकल्प येथे उत्कृष्ट काम केले आहे. नष्ट होत असलेल्या वृक्षांच्या दुर्मिळ प्रजाती वाढविण्यासाठी नर्सरी निर्मिती व अन्य उपक्रम राबविले. शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड jयोजनेची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. सुमारे दोन लाख वृक्ष लावले. आदिवासी भागात गांडूळ खत प्रकल्प केले. आदिवासी भागात आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनबाबतीत जन-जागृती निर्माण केली.
२०१७ मध्ये जंगल तस्करी करणाऱ्या ६० आरोपींना पकडले. पेंच व्याघ्रप्रकलपात वाघ व खवल्या मांजराची शिकार करणाऱ्या या आरोपींवर कठोर कारवाई करण्यात पुढाकार घेतला. शासनाने उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी राज्य स्तरावरून पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे योजिले आहे. पाखले यांचे कार्य, गोफनीय अहवाल, सचोटी, चारित्र्य, कार्यक्षमता, बुद्धीमत्ता, शौर्य यासर्व बाबींचा विचार करून या सुवर्ण पदकासाठी त्यांची निवड केली आहे.
आई-वडिलांच्या संस्कारामुळे काम करण्याची ऊर्जा मिळाली. निवडलेल्या क्षेत्रात प्रावीण्य मिळविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. वरीष्ठ अधिकारी, सहकारी यांची उत्तम साथ लाभल्याने हे सांघिक यश प्राप्त झाले आहे.
-पांडुरंग पाखले(वनक्षेत्रपाल)