शेतकऱ्यांचा आरोप, जिल्हाधिकार्यांकडे तक्रार
प्रतिनिधी / मिरज
रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी शासनाने अधिगृहित केलेल्या जमिनीच्या बदल्यात समाधानकारक मोबदला बाधित शेतकऱ्यांना मिळाला नाही. भूसंपादन अधिकाऱ्यांनी जमीनदार शेतकऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर भूसंपादनाचा निवाडा करून भूसंपादन कायद्यातील तरतुदींचा भंग केला आहे, असा आरोप बाधित शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन देऊन तक्रार करण्यात आली आहे.
मिरज आणि कवठेमंकाळ तालुक्यातील बहुतांशी गावातून रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी अधिगृहीत करण्यात आल्या आहेत. स्थानिक भूसंपादनाचा अधिकार हा भूसंपादन अधिकारी तथा प्रांताधिकाऱ्यांना असतो. राष्ट्रीय महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले तरी बाधित शेतकऱ्यांना पूर्ण मोबदला मिळाला नाही. ज्या शेतकऱ्यांना मिळाला तोही असमाधानकारक आहे. भूसंपादन अधिकाऱ्यांनी जमीन भूसंपादन निवाडा करतेवेळी शेतकऱ्यांना विश्वासात घेतले. त्यामुळे या भूसंपादनाला आमचा विरोध आहे. असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रार पत्रात म्हटले आहे.