आमदार अनिल बाबर यांची पाटबंधारे अधिकाऱ्यांशी बैठक
प्रतिनिधी / विटा :
विटा शहरात गेल्या काही दिवसांपासून पाण्याची टंचाई जाणवत आहे. घोगाव योजनेच्या पाईपलाईनची गळती आणि खंडित वीज पुरवठा आदी कारणाने पुरेशा पाणी पुरवठ्यात अडचणी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार अनिल बाबर यांनी आळसंद तलावाची पाहणी केली. त्यानंतर थेट सांगली येथील पाटबंधारे विभागाचे अधिकारी मिलिंद नाईक यांच्याशी बैठक करीत आळसंद तलावात पाणी सोडण्याच्या सूचना केल्या.
विटा शहरात गेल्या काही दिवसांपासून पाण्याची टंचाई जाणवत आहे. दोन, तीन दिवसातून पाणी सुटत आहे. घोगाव योजनेच्या पाईपलाईनची गळती आणि खंडित वीज पुरवठा आदी कारणाने पुरेशा पाणी पुरवठ्यात अडचणी निर्माण होत आहेत. गळती काढण्यासाठी पाणी पुरवठा कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. मात्र तब्बल 35 किलोमीटरचे अंतर आणि अडचणी यामुळे पाणी पुरवठ्यावर ताण येतो आहे.
विटा नगरपालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र आळसंद नजीक आहे. या तलावात पाणी आल्यास विटा शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होणेस मदत होणार आहे. या पार्शवभूमीवर आमदार अनिल बाबर यांनी कार्यकर्त्यांच्या समवेत आळसांड तलावाची पाहणी केली. त्यानंतर आमदार बाबर यांनी तडक सांगली गाठत पाटबंधारे विभागाचे अधिकारी मिलिंद नाईक यांच्याशी बैठक केली. यावेळी आळसंद तलावात ताकारी योजनेचे पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती आमदार बाबर यांनी दिली. या तलावात ताकारी योजनेचे पाणी आल्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे आमदार बाबर यांनी सांगितले.