प्रतिनिधी/ सांगे
ऊस उत्पादक संघर्ष समिती, गोवातर्फे सरकारला मागण्यांचे निवेदन सादर केले असून सरकारला दहा दिवसांची मुदत दिली होती. पण अद्याप लेखी आश्वासन न मिळाल्याने शनिवार 2 पासून सांगे येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयाजवळ धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती समितीचे उपाध्यक्ष चंदन उनंदकर यांनी सांगे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी समितीचे अध्यक्ष कुष्ट गावकर, बाबुलो गावकर व सांतान हजर होते.
सरकारने अजूनपर्यंत शेतकऱयांकडे लेखी करार केलेला नाही. ऊस उत्पादकांची मागणी आहे की, रु. 3000 प्रति टनऐवजी रु. 3600 नुकसान भरपाई देण्यात यावी. कारण एकीकडे महागाई वाढत आहे. ऊस उत्पादक संघटना सरकारला साथ देत असून सरकारबरोबर आहे. पण शेतकऱयांच्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी विषय लावून धरत नाही. त्यामुळे वाडे-सांगे येथे 20 डिसेंबर रोजी ऊस उत्पादकांची बैठक होऊन सरकारला मागण्यांचे निवेदन सादर केले. पण अजूनही लेखी उत्तर सरकारने दिलेले नाही, असे उनंदकर यांनी सांगितले.
त्यामुळे 2 पासून जोपर्यंत सरकार लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत बेमुदत धरणे धरण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. सरकारला दिलेली दहा दिवसांची मुदत 1 रोजी संपत आहे. या धरणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार तसेच जे राजकारणी 2022 ची विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी करत आहेत त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. तसेच गोव्यातील तमाम ऊस उत्पादक शेतकऱयांनी टप्याटप्याने उपस्थिती लावावी, असे आवाहन उनंदकर यांनी केले आहे.
ऊस उत्पादकांच्या हितासाठी आंदोलन
काही लोक या विषयावर आम्ही राजकारण करत असल्याचा आरोप करतात. त्यांना आपण सांगू इच्छितो की, यामागे कोणतेच राजकारण नसून केवळ ऊस उत्पादकांच्या हितासाठी हे धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे. काँग्रेस, मगो, भाजप, आप, गोवा फॉरवर्ड, अपक्ष या सर्वांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. खुद्द भाजपशी संलग्न शेतकऱयांचा जास्त सहभाग राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
अन्यायाविरुद्ध आपण सदैव पुढे असणार हे सांगत आलो आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱयांबरोबर अध्यक्ष म्हणून आपण कायम असणार असून सरकारने लेखी आश्वासन दिल्याशिवाय शेतकरी मागे हटणार नाहीत, असे उपसरपंच व समितीचे अध्यक्ष कुष्ट गावकर यांनी सांगितले. कोविड-19 ची महामारी असल्याने सर्वांना जिवाची काळजी आहे. त्यामुळे शेतकरी टप्याटप्याने भाग घेतील, असे त्यांनी सांगितले.
पाईकदेवाला साकडे व फेरीने होणार प्रारंभ
2 रोजी सकाळी सांगेचे आराध्य दैवत श्री पाईकदेवाला साकडे घालून सांगे क्रीडा संकुल ते सांगे बाजार परिसरात फेरी काढून धरणे आंदोलनाला प्रारंभ होणार आहे. शेतकरी सोबत भांडी व इतर सामान घेऊन येणार असून धरण्याच्या ठिकाणी चहा, नाश्ता व जेवण तयार केले जाणार आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार आहे, असे गावकर यांनी स्पष्ट केले.
…तर सरकारला परिणाम भोगावा लागेल
सरकारने अजूनपर्यंत शेतकऱयांना कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाही. सरकारने कोणत्याच भ्रमात राहू नये. 2022 ची विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. जर का सरकार ऊस उत्पादकांकडे दुर्लक्ष करत असेल, तर शेतकऱयांना विचार करावा लागेल व त्याचा परिणाम सरकारला भोगावा लागेल, असा इशारा गावकर यांनी दिला.
आम्हाला नेते व्हायचे नाही तसेच राजकारणही करायचे नाही. शेतकऱयांकडे दुर्लक्ष केले जात आहे. हेच का ते आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हे आंदोलन सरकारच्या विरोधात नसून ऊसपिकाला योग्य नुकसान भरपाई मिळावी व साखर कारखाना लवकर चालू व्हावा यासाठी आहे. धरणे आंदोलनाची नोंद घेऊन संपूर्ण गोव्यातील शेतकऱयांनी त्यात सहभागी व्हावे, असे त्यांनी आवाहन केले.