फुलबाग गल्ली-भांदूर गल्ली परिसरातील गटारीचे बांधकाम : सांडपाण्याच्या निचऱयासाठी उपाय आवश्यक
प्रतिनिधी /बेळगाव
तानाजी गल्ली रेल्वे फाटकाजवळ सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने फुलबाग गल्ली व भांदूर गल्ली परिसरातील गटारीचे बांधकाम महापालिकेकडून करण्यात येत आहे. गटार बांधण्याकरिता गटारीवरील अडथळे हटविण्याबरोबरच मोठी चर खोदण्यात आली आहे. मात्र जुन्या इमारतीच्या पायथ्याशी सांडपाणी साचल्याने इमारतीला धोका निर्माण झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.
प्रत्येक पावसाळय़ात रेल्वे फाटकाजवळ सांडपाणी साचून भांदूर गल्ली, ताशिलदार गल्ली परिसरात पाणी भरते. त्यावेळी काही नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. या समस्येचे निवारण करण्यासाठी गटारीचे बांधकाम करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने कामकाज हाती घेण्यात आले आहे. गटारीचे बांधकाम करण्यासाठी तानाजी गल्ली रेल्वे फाटक बंद ठेवण्यात आले आहे. तसेच रेल्वे फाटक ते फोर्टरोडपर्यंतच्या फुलबाग गल्ली रस्त्याशेजारील गटारीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. याकरिता जेसीबीने गटारीची चर खोदण्यात आली असून, गटारीवर असलेले अडथळे हटविण्यात आले आहेत. रेल्वे फाटकाजवळ असलेल्या जुन्या इमारतीच्या पायाजवळून चर खोदण्यात आली असून, त्या चरीमध्ये सांडपाणी साचले आहे. इमारत जुनी असल्याने पाणी पाझरून भिंत कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळे सांडपाण्याचा निचरा होण्याच्यादृष्टीने आवश्यक उपाय योजना राबवाव्यात. इमारतीला धोका पोहोचण्यापूर्वी कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहेत.