उद्या दि. 10 मे, विख्यात गीतकार जगदीश खेबूडकर यांची जयंती. त्यानिमित्त त्यांच्या कन्येने सांगितलेल्या काही आठवणी……
उद्या 10 मे गीतकार जगदीश खेबूडकर ऊर्फ नानांची जयंती. गेल्या रविवारी 3 मे 2020 रोजी नाना आपल्यातून जाऊन 9 वर्ष झाली. त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या खूप साऱया आठवणींच्या साठय़ातून काहींचा आपल्याशी संवाद! 3 मे 2011 रोजी मराठी चित्रपटसृष्टीतील एक सदाबहार गीतवटवृक्ष उन्मळून पडला आणि आम्हा खेबूडकर कुटुंबीयांचा आधारवड नाना हरपले, ते पुन्हा कधीही न येण्यासाठी. मराठी चित्रपटसृष्टीला व मराठी साहित्यक्षेत्राच्या आकाशाला गवसणी घालण्याचे अवघड काम नानांनी केले.
लई नको आशा, लई नको पैसे
गोड मानीन मीठ भाकरी
नाशवंत ही बंगला गाडी
शिरीमंतीची मला न गोडी
नको पुरस्कार अन मानसन्मान श्रोत्यांची दे पंढरी…!
असे म्हणणाऱया नानांनी शब्द शब्द जुळवून काव्यसंपदेचा अथांग महासागर निर्मिला. आपल्या सर्वांचे लाडके नाना.. एक असामान्य व्यक्तिमत्त्व होते, एक अलौकिक दैवत्व प्राप्त असलेला प्रतिभावंत! पण साधे, निर्मळ, प्रेमळ, निर्मोही, निर्व्यसनी, माणूस….त्यांच्याकडे होते ते खूप मोठय़ा अनुभवाचे, ज्ञानाचे आणि ऊर्जेचे भांडार. प्रचंड आणि अखंड वाचन आणि लिखाण करतानाची त्यांची मूर्तीच डोळय़ापुढे येते आणि नानांची मुलगी असल्याचा मला खूप खूप अभिमान वाटतो.
अगदी मधुर, रसाळ, सौंदर्याने भरलेली चैतन्यपूर्ण वाणी. जणू सरस्वती त्यांच्या जिभेवर नांदायची. चालता बोलता सहज वागणारा माणूस, पण स्टेजवर चढले की काहीतरी अंगात संचारायचे असे वाटायचे. इतके सुंदर अप्रतिम व्याख्यान द्यायचे की समोरचा श्रोतृवर्ग कितीही वयाचा असो, तल्लीन होऊन ऐकत असे. नानांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱयात जाऊन आपल्या प्रतिभेचा प्रसाद मुक्तपणे सर्व श्रोत्यांना वाटला. या महान कलातपस्वीला व्यावहारिक, भौतिक जीवनातील कोणतीही आसक्ती नव्हती. मी तर त्यांच्यातला एक वैराग्यप्राप्त संतच जणू अनुभवला आहे. देवाच्या कृपेने खूप सहवास मिळाला त्यांचा. मला व माझ्या पती व मुलांना देखील…! खूप प्रेम उधळले जणू आम्हा कुटुंबीयांवर त्यांनी-अक्षरशः न्हाऊ घातले मायेने सर्वांना! आम्ही चौघे भावंडे-कविता, अभंग, अंगाई, मुक्तछंद. सर्वजण सुशिक्षित व कलेची आवड असणारेच-नाना म्हणजे मुले, नातवंडे, जावई, सुना असे सर्वजण जोडलेला माणूस. सर्वांवर त्यांनी खूप प्रेम केले.
सर्वांना खूप अगत्याने खाऊ पिऊ घालायचे. माझ्या विवाहानंतर 1 महिन्यातच मोठय़ा बहिणीचे पती अचानक ह्य्दयविकाराने गेले. नानांसाठी तसेच संपूर्ण कुटुंबासाठी मोठा धक्का होता तो…! एकीकडे एक जावई आल्याचा आनंद तर दुसरीकडे एक जावई गेल्याचे दु:ख… कसे पचवावे हे सगळे? ताईला त्यांनी कोल्हापुरात आणले आणि तिच्यातली उमेद जागी करावी, जगायला उभारी द्यावी म्हणून तिच्यासोबत त्यांनी वयाच्या 72 व्या वषी पत्रकारितेचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला तर माझ्यासोबत रेकीच्या दोन परीक्षाही दिल्या.
माझ्यासाठी एक खूप आनंदाची गोष्ट म्हणजे मी एम. ए., बी. एड. झाल्यानंतर स्कूल मॅनेजमेंटचा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा कोर्स करत असताना शोधनिबंध सादर करायचा होता. त्यासाठी विषय होता-राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांना नोकरी करताना आलेल्या अडचणी. परंतु मी सावंत सर व अरुण पाटील सर यांना विनंती केली की नानांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जरी मिळाला नसला तरी महाराष्ट्रातले सर्व मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत तर मी ‘जगदीश खेबूडकर यांना सांस्कृतिक विकसनामध्ये आलेल्या शालेय समस्या आणि उपाययोजना-एक अहवाल’ हा विषय घेतला तर चालेल का? त्यांनी नानांचा मान राखून मला विशेष परवानगी दिली आणि तो नानांच्या मदतीने मी पूर्ण केला. त्याचे टायपिंग झाल्यावर पूर्ण प्रूफ रिडिंगसुद्धा नानांनी मला करून दिले होते. पूर्ण मार्गदर्शन केले होते. हा अहवाल पूर्ण झाल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला होता.
त्यांनी माझ्या मुलांसाठी पण खूप केले. काही काळजी करू नका मी आहे ना-असा सतत सर्वांना पहाडासारखा धीर द्यायचे. अखेरपर्यंत सर्वांच्यात मिळून मिसळून एकत्र कुटुंबाचा आनंद घेत राहिले. अत्यंत उत्साही, सणासुदीला सगळे साग्रसंगीत साजरे करायची आवड. भाजी मंडईत जाऊन सर्वांना भाजी आणून द्यायची आवड, आंब्याच्या सीझनमध्ये चारही मुले अन बहिणीच्या घरी आंब्याच्या पेटय़ा स्वतः नेऊन द्यायची गडबड. गणपतीला नातवंडांना घेऊन स्वतः कुंभार गल्लीत जाऊन भरपूर गणपती बघत आणि ‘मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया’ करत स्वतः गणपती घरी आणायची हौस, नवरात्रीला, खंडेनवमीला झेंडूचा गलटा आणून खंडे पुजायची आवड. हरतालिकेला हरतालका, नागपंचमीला नाग, बैलपोळय़ाला बैलजोडी. सगळे काही खूप हौसेने करायचे आणि आईदेखील त्यांच्या प्रत्येक हौसेला पुरून उरणारी. त्यामुळे खूप आनंद लुटला आम्ही सर्वांनी…! ‘जगासाठी मी जगदीश खेबूडकर आहे पण घरी तुम्हा सर्वांचा नाना आहे गं’ असे ते आम्हाला सांगायचे. सरळ साधे सोपे जगावे, नेहमी सर्वांचे चांगले करावे, सर्वांसाठी सरळमार्गी सुटसुटीत वागावे. असे करायला विचार करायला लागत नाही. एखाद्याचे वाईट करायला वाईट विचार अन खूप कष्ट घ्यावे लागतात-आणि त्याचे फळही वाईटच मिळते म्हणून चांगले वागावे. करता आले तर चांगले करावे नाहीतर सोडून द्यावे. वाईट आठवणी, आयुष्यात आलेले वाईट प्रसंग हे प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतात. पण ते कधीच उगाळत बसायचे नाही. कोळसा उगाळावा तेवढा काळाच असतो. आयुष्यातल्या अशा वाईट माणसांवर, अनुभवांवर, प्रसंगांवर फुली मारायची, पाने पलटायची अन पुढे चालायचे-चलैती चलैती-चालत रहा-थांबायचे नाही की रडत बसायचे नाही-आलेल्या प्रसंगाला सामोरे जायचे, टक्कर द्यायची, संकटाला तुडवायचे आणि पुढे जायचे, मार्ग काढायचा, खंबीर राहायचे. कोणत्याही वाईट प्रसंगामुळे डगमगून जायचे नाही, हताश व्हायचे नाही, आलेल्या संकटाचा सामना करायचा हेच आम्हाला त्यांनी शिकवले. खरंतर त्यांना शतायुषी व्हायचे होते, खूप जगायचे होते, खूप लिहायचे होते, खूप सारी निर्मिती करायची होती. ‘मला म्हातारं होऊन मरायचंय, कुठल्या आजारानं मरायचं नाही’ असे तळमळून सांगायचे, पण नियतीला हे मान्य नक्हते. तिने तिचे कार्य साधले. एखादे काम हातात घेतले की ते पूर्ण झाल्याशिवाय शांत बसायचे नाही असे सांगणारे नाना मात्र आपल्या सर्वांसाठी 100 वर्षे संपणार नाही इतके काम बाकी ठेवून गेले आहेत…नाना म्हणायचे ‘स्वर्गात गेल्यावर देवानं मला विचारलं की पुढच्या जन्मी तुला कोण व्हायचंय? तर मी सांगेन पुढच्या जन्मी मला जगदीश खेबूडकरच व्हायचंय’ इतके जगण्यावर आणि प्रतिभेवर उदंड आणि अफाट प्रेम करणारे नाना आज आपल्यात असते तर म्हणाले असते….
अशीच राहू द्या प्रेमभावना, उदंड राहो माया
शब्द रूपे मी काव्य ठेविले, रसिका तुज रिझवाया
पुनर्जन्म हा असे मानावा, मरण नसे वाया
कवी म्हणुनी जन्म येईन रसिका तुज रिझवाया..
रसिका तुज रिझवाया….!
पुनश्च अंतःकरणापासून या शब्दप्रभूला मानवंदना…!! नानांचे उर्वरित कार्य करायला बळ मिळू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!
-अंगाई खेबूडकर-महाजनी