प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहर व परिसरात दर दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना देखील सातारकर व उपनगरातील नागरिकांच्या वर्तनात फार काही फरक पडला नव्हता. मात्र, गेल्या दोन दिवसात वाढू लागलेली बळींची आणि कोरोना बाधितांची संख्या पाहून सातारकर चांगलेच हादरले आहेत. त्याचा इफेक्ट शनिवारपासून जाणवू लागला आणि रविवारी तर साताऱयातील रस्ते ओस पडले होते. एकीकडे भर उन्हाचा तडाखा अन् दुसरीकडे कोरोनाच्या दुसऱया लाटेचा तडाखा यामध्ये सातारकर चांगलेच पोळून निघाले आहेत.
लॉकडाऊन सुरु होऊन सहा ते सात दिवस झाले. मात्र, सातारा शहर परिसरातील वर्दळ हटण्यास तयार नव्हती. शहरात अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडी असल्याने नागरिक खरेदीसाठी बाहेर पडतच होते. तर याच काळात सातारा जिल्हय़ात उच्चांकी बाधित संख्येने सर्वांना पुन्हा संकटात टाकले. सातारा शहर व परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला असून देखील लोक प्रशासनाच्या नियमांना तिलांजली देत होते. गेल्या दोन दिवसात वर्षभरातील उच्चांकी बाधित संख्या 1 हजार 583, तर रविवारी एक हजार 434, त्या अगोदर हजारांच्या पटीत येणारी संख्या पाहता आणि वाढत असलेली बळींची संख्या पाहता नागरिक चांगलेच हादरले. शनिवारपासूनच मग गर्दी करणारे सातारकर घरातच बसू लागलेत.
रविवारी तर सकाळपासून दिसणारी वर्दळ गायब झाली होती. तापमान 36 अंश सेल्सिअसला जावून भिडले असून त्यातच कोरोना स्थितीही गंभीर झाली. बेड मिळनेही दुरापास्त झाल्याने सातारा शहरातील कोव्हिड उपचार करणाऱया दवाखान्यात गर्दी झालीय. जम्बो हॉस्पिटल, सिव्हिल हॉस्पिटलात बेड उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यामध्ये आता काही दिवस तर घरात बसून संसर्गापासून स्वतःला व कुटुंबाला वाचवणे हा पर्याय हातात राहिल्याचे लक्षात आल्यानंतर साताऱयातील गर्दी ओसरली आहे.