प्रतिनिधी/ सातारा
शहरातील सिंग्नल यंत्रणेचा बंद चालुचा खेळ नेहमी पहायला मिळत असतो. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी लावण्यात आलेले सिंग्नल गेल्या काही दिवसापासून धूळ खात पडले आहेत. सेवन स्टॉर मॉल, राधिका रोड, जिल्हा परिषद चौक येथून प्रवास करताना वाहनधारकांना जीवमुठीत घ्यावा लागत आहे. यामुळे चौकात निर्माण होणारी कोंडी वाढत असताना यावर संबंधित प्रशासनाकडून तोडगा निघत नाही.
सातारा शहरातील मुख्य चौकात गेल्या काही दिवसापासून पुन्हा कोंडी निर्माण होत आहे. सेवन स्टॉर मॉल परिसरात पोवईनाका, खंडोबाचा माळ, राधिका रोड, एसटी स्टॅड या मार्गाने येणाऱया वाहनांची संख्या सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास जास्त असते. तसेच रस्ता ते फुटपाथ वर गेल्या काही दिवसापासून फळ विक्रेते, खाद्य पदार्थ, भाजी विक्रेते यांनी थाट मांडला आहे. सकाळच्या वेळेत एसटी बसला प्रवाशांची गर्दीही वाढलेली असते. खाजगी वाहनांचा या मार्गाने दिवसभर प्रवास सुरू असतो. पद्चारी रस्त्यावरून जाताना जीवमुठीत घेत असतात. दिवसेंदिवस या चौकात परिस्थिती बिकट बनत आहे.
मात्र याकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. चौकात सिंग्नल यंत्रणा बसवण्यात आलेली आहे. पण ती चालू कधी बंद कधी हे वाहनधारकांना काय पण वाहतूक पोलीसांनाही कळत नाही. वाहतूक पोलीस या चौकात उभे असतात. ते कागदपत्रे तपासणे यावर जास्त भर देतात. तर सतत निर्माण होणारी वाहतूक कोंडी ही वाहनधारकच सोडवत असतात. या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी काही वाहनधारक बेभान होवून वाहने पळवत असतात. यांचा नाहक त्रास इतर वाहनधारकांना होत असतो. तरीही अशा वाहनधारकांवर कारवाई होताना दिसत नाही. यामुळे सिंग्नल यंत्रणा असूनही नियम पाळणार कोण ? आणि नियम पाळले नाही तरी चालते अशी धारणा वाहनधारकांच्यात निर्माण झाली आहे.
अतिक्रमणावर ठोस कारवाई हवीच…
साताऱयातील सेवन स्टॉर मॉल परिसरात अतिक्रमणावर कधीही पालिकेचा हातोडा पडत नाही. ही अतिक्रमण हटवण्याची मोहीम वाहतूक पोलीसांच्या खांद्यावर येऊन पडते. पोलीसांकडून कारवाई झाल्यानंतर ही चार दिवसांनी जै से थे अशीच स्थिती निर्माण होते. या विक्रेत्यांवर ठोस कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून नेहमी जोर धरत असते. मात्र पालिका बघ्याची भूमिका घेत असल्याने कोंडी वर तोडगा निघत नाही.