सातारा / प्रतिनिधी :
पाटण तालुक्यातील कडवे खुर्द येथील नागरिकांची गेली चार-पाच दिवस पाण्यासाठी फरपट सुरू आहे. या सर्व प्रकाराबाबत ग्रामपंचायतमार्फत पाटण येथील तालुका पाणी पुरवठा दुरुस्ती विभागातील अधिकारी साळुंखे यांच्याकडे वारंवार पत्र व्यवहार आणि बोलणी मागील सहा महिन्यापासून सुरू होती.परंतु, या मागणीची दखल जिल्हा परिषद व पंचायत समितीने घेतली नाही. उलट त्यांच्या समस्येला कोलदांडा दाखवला आहे.
गेल्या पाच दिवसापासून गावातील लोकांचा पाणी पुरवठा पूर्ण खंडीत झाला असून, ग्रामपंचायतमार्फत बोर खोदण्यात आली होती. त्यावर हातपंप बसवला होता. मात्र, त्याची झीज होवून चैन तुटल्याने पूर्णत: पाणी पूरवठा बंद आहे. लोकांचे हाल होत असताना स्थानिक सत्ताधारी व विरोधक गाढ झोपले आहेत. समस्येवर उपायोजना करायच्या सोडून राजकीय डावपेच करत बसले आहेत. सत्ताधारी फक्त कागदी घोडे पत्रव्यवहार केल्याचे नाचवत आहेत. गावातील नागरिकांना तहान भागवण्यासाठी खाजगी मालकीच्या बोरवर जावे लागत आहे किंवा दूरवरून विहिरीचे पाणी हंडा, कळशीतून भरून डोक्यावरून आणावे लागतेय.
केळेवाडी वरची व रेडेवाडीची पाणी समस्या सोडवणार कधी?
रेडेवाडी येथे गेल्या दोन वर्षापासून पिण्याची पाईपलाईन गंजली असून टाकीतून गढूळ पाणी पिण्यास जाते आहे. दुरूस्तीसाठी मंजूरी मिळून निधी वर्ग झाला. परंतू आजपर्यंत ते काम ठेकेदारांनी व अधिकाऱ्यांनी रेगांळवले आहे. दोन किलोमीटर पायी चालत डोंगरातील छोट्याशा डबक्यातून डोक्याने पाणी आणावे लागते. याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे.केळेवाडी वरची येथे दोन तीन वर्षापासून हातपंप नादूरूस्त आहे. हातपंपातून गढूळ व तेलकट पाण्याचा निचराव होत आहे. अस्वच्छ पाण्यामुळे लोकांच्या आरोग्यास हानी पोहचू शकते. मात्र यावर कोणतीच उपायोजना न करता ग्रामपंचायत जबरदस्तीने पाणी कर वसूल करते.