प्रतिनिधी / सातारा
कांद्याची दरवाढ होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे असणारा कल वाढला आहे. यामुळे बाजारात कांदा रोप अर्थात तरव्याची मागणी वाढल्याने दर तेजीत आहेत. पूर्वी वाफ्यावर होणारी तरवा विक्री आता फुटावर होत आहे.
रब्बीत माण, खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा या तालुक्यात होणारी कांद्याची लागवड आता पश्चिमेकडील सातारा, कराड, वाई, जावली, पाटण तालुक्यात ही वाढु लागली आहे. पश्चिमेकडील तालुक्यात तर आंतरपीक म्हणून लागवड करण्याचा कल वाढला आहे. मागील तीन ते चार महिन्यापासून कांद्याचे दर शेतकऱ्यांना दिलासा देणारे आहेत.
त्यामुळे कांद्याच्या रोपापासून बियाणांची मागणी वाढली आहे. साधारण तीन ते चार हजार रुपये किलो कांदा बियाण्यांचे दर गेले आहेत. सध्या रोपांची लागण वेगाने सुरु झाली आहे. पूर्वी वाफ्यावर कांद्याच्या रोपांची विक्री केली जात होती. मात्र कांद्याचे दर तेजीत असल्याने रोपांची विक्री फुटावर केली जात आहे. यामुळे एक एकर क्षेत्रासाठी रोपांना कमीत कमी 18 ते 20 हजार रुपये खर्च येत आहे. जिल्ह्यातील भमागील चार ते पाच वर्षापासून कांद्याच्या क्षेत्रात वाढ होत गेली आहे. नऊ ते दहा हजार क्षेत्रावर होणारी कांदा लागवड या हंगामात सुमारे 12 ते 13 हजार हेक्टरापेक्षा जास्त क्षेत्रावर होण्याची अंदाज व्यक्त केला जात आहे.
कांद्याचे दर समाधान कारक राहतील. या आशेवर कांदा लागवड केली जात आहे. सध्या मिळत असलेल्या दराच्या हिशोंबावर रोपाचे दर वाढले असल्याने शेतकऱ्यांचा भांडवली खर्च वाढला आहे. केंद्र सरकारने कांदा पिकांवरील निर्यात बंदी उठवल्याने कांदा दरात सुधारणा होऊ लागली आहे. दरातील तेजी ग्राह्य धरुन शेतकऱ्यांनी कांदा लागवडीवरचा खर्च वाढवला आहे.