सातारा जिह्यातील आमदारांकडून दिव्यांगाना दाखवला अंगठा
प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्ह्यातील अकरा तालुक्याच्या आठ विधानसभा मतदार संघात लाखो दिव्यांग आहेत. हेच दिव्यांग बांधव मतदानाच्या दिवशीच आमदारांना आठवतात. त्यांच्या स्थानिक विकास कार्यक्रमातून निधी देता येतो. तो दिला गेला नाही. दिव्यांगाना लाभ दिला गेला नाही असा आरोप प्रहार संघटनेने केला असून जिल्ह्यातील दोन दिव्यांगासाठी स्वतःच्या आमदार निधीतून माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिल्याने त्यांचे आभार मानले.
सातारा जिल्ह्याचे प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल कारंडे यांनी आमदार सदाभाऊ खोत यांचे विशेष आभार मानत. ते म्हणाले, सातारा जिल्ह्यात आठ मतदार संघ आहेत. आठ मतदार संघातील आठ आमदार आहेत. विधान परिषदेचे आमदार आहेत. खासदार आहेत. त्यांच्याकडून दिव्यांग बांधवांना आजपर्यंत दिव्यांगाच्या निधीचा वाटप कुठे केल्याचे जाहीर केले नाही. त्यानुसार आम्ही कुठेही ऐकले नाही.पाहिले नाही. दि.12 जुलै 2016 च्या जीआरनुसार दिव्यांगाना मदत केल्याचे आटवत नाही. हा अन्याय आहे.
दिव्यांगांना त्यांच्या हक्काचा लाभ मिळाला पाहिजे. त्या आदेशानुसार दिव्यांगाकरता मदत करण्यासाठी विधी मंडळ सदस्य प्रती वर्षी कमाल 10 लाख रुपयांचा मर्यादेत निधी प्रस्तावित करु शकतील. अशी मदत पात्र व्यक्तींना तीन चाकी सायकल, हस्तचलित खुर्च्या, वाटप करण्यात यावेत. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळांच्या वर्गखोल्या, संगणक खोल्या, स्वच्छतागृहे, संरक्षण भिंती आदी कामांसाठी 20 लाख रुपयांचा निधी खर्च करता येईल. अनुदानित शिक्षण संस्थांना दिव्यांग शाळांसाठी संगणक व साहित्य पुरवण्योचा 10 लाख निधी देता येईल, अशी मदत देता येते असे त्यांनी सांगितले. तर खंडाळा तालुका अध्यक्ष समिना शेख यांनीही खंत व्यक्त केली.