प्रतिनिधी / सातारा :
सातारा जिल्हा परिषदेने सातारा आणि जावली तालुक्यातील दुर्गम शाळा घोषित करताना शासनाच्या अध्यादेशाप्रमाणे तीन निकष न लावता चार निकष लावले आहेत. शासनाच्या अध्यादेशाप्रमाणे तीन निकष लावावेत तसेच मंडल निहाय पर्जन्यमान गृहीत धरावे, वाहतूक व्यवस्थेबाबत फेर सर्व्हे करावा यांसंदर्भाने आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्याशी चर्चा केली. गौडा यांनी सर्व सूचना मान्य करून लवकरच बदल करण्याचे जाहीर केल्याने सातारा-जावली तालुक्यातील दुर्गम शाळा निकषाचा घोळ मिटला आहे.
सातारा जिल्हा परिषदेने सातारा तालुक्यातील 10 तर जावली तालुक्यातील 18 दुर्गम शाळांची यादी घोषित केलेली आहे. याला अनेक शिक्षक संघटनांनी विरोध दर्शवला होता. दुर्गम शाळा घोषित करताना चार निकष लावण्यात आले असून शासनाच्या अध्यादेशानुसार तीन निकष लावून दुर्गम शाळांची वर्गवारी करणे गरजेचे आहे. त्यामुळे ही समस्या सोडवा, अशी मागणी विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शिवेंद्रराजे यांच्याकडे केली होती.
शिक्षकांच्या मागणीनुसार मंडल निहाय पर्जन्यमान गृहीत धरावे, वाहतूक व्यवस्थेबाबत फेर सर्व्हे करावा, दुर्गम शाळा ठरवताना चार ऐवजी शासनाच्या अध्यादेशानुसार तीन निकष लावावेत असे, शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले. यावर गौडा यांनी सकारात्मकता दर्शवून शिक्षकांच्या मागणीनुसार बदल करू, असे सांगितले. यामुळे दुर्गम शाळा निकषाचा घोळ मिटला असून शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी दीपक भुजबळ, सुरेश जेधे, रघुनाथ दळवी, अनिल चव्हाण, शंकर देवरे, शंकर जांभळे, सुजाता जाधव आणि शिक्षक उपस्थित होते.