प्रतिनिधी / सातारा
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 1 जूनपर्यंत कडक लॉकडाऊन करण्याचा प्रशासनाने शनिवारी घेतला. जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीसह म्युकर मायकोसिसचा धोका वाढण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासन अलर्ट झाले आहे. त्यामुळे सोमवारपासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे.
बॅंकांसह पेट्रोल पंप दुकाने बंद
निर्बंध, बँका, किराणा, रेस्टॉरंट, भाजीपाला विक्री बंद,पेट्रोल-डिझेल फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच उपलब्ध असणार आहे. कोरोनाचा वाढत चाललेला संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी 25 मे ते 1 जून या दरम्यान कडक लॉकडाऊनचा आदेश जारी केला आहेत. त्यात बांधकाम क्षेत्र, सर्व दुकाने किराणा व भाजीपाला, चिकन मटण सह, बँका, पेट्रोल पंप, रेस्टॉरंटमधील बार असे सर्व बंद ठेवण्यात येणार आहे. पेट्रोल विक्री फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच सुरुच ठेवण्यात येणार आहे. मिटिंगाही ऑन लाईन घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी नव्याने काढले आहेत. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नव्याने नियमावली जाहीर केली आहे. त्यामुळे 25 मे पासून कडक लॉकडाऊन जिल्ह्यात सुरू होणार आहे. त्यामध्ये शेतीशी निगडित असलेल्या दुकानांना पूर्णपणे बंद राहणार आहेत.त्यांनी आपली सेवा घरपोच करावी असे आदेशात नमूद आहे.
एसटी सेवाही राहणार बंद
एसटी सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. पेट्रोल पंप, बँक ही बंद राहणार आहेत. त्यामुळे कोरोनाला ब्रेक लागण्यासाठी हा कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातच अव्वल ठरत असलेल्या सातारा जिल्हय़ाचा कोरोना आलेख उंचावत असताना नागरिक मात्र बेफिकीर झाले होते. त्यामुळे जिल्हय़ात 4 मे पासून लॉकडाऊन करण्यात आला. यावेळी अनेक गोष्टींवर निर्बंध आणले असले तरी विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या काही केल्या कमी होत नव्हती. त्यामुळे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी वारंवार सांगूनही नागरिक फिरताना राहत नव्हते. पोलिसांनीही कारवाई वाढवल्या होत्या. परंतु कोरोनाचा वाढता आलेख रोखण्यात साताऱयाला तितकेसे यश मिळाले नाही. आता चार दिवसांपासून कोरोनाचा आकडा स्थिरावण्यात यश मिळत असले तरी तो समाधानकारक नसल्यामुळे जिल्हय़ात आणखी कडक लॉकडाऊन करण्याची आवश्यकता भासू लागली. त्यामुळेच जिल्हाधिकाऱयांनी सोमवारपासून कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे.
नागरिकांचा बेफिकिरपणा कारणीभूत
किराणा व भाजीपाला आणायच्या नावावर अनेकजण फिरत आहेत. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यात व्यत्यय येत होता. त्यामुळेच आता जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये किराणा दुकाने पूर्णतः बंद करण्यात आली आहेत. त्याचबरोबर सर्व मंडई बंद करण्यात आली असून भाजीपाला विक्रीसही मनाई करण्यात आली आहे. पेट्रोल पंप 24 तास सुरू राहणार असले तरी केवळ अत्यावश्यक सेवेत कार्य करत असलेल्या व्यक्तींसाठीच पेट्रोल मिळणार आहे. त्याचबरोबर हॉटेल, रेस्टॉरंट, बिअर बार, परमिट रुम यांच्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
सकाळी 7 ते 9 हे सुरू राहिल
रुग्णालये ,निदान केंद्रे, दवाखाने, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, 24 तास औषध दुकाने, औषध कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा व सदर सेवा पुरविणारी उत्पादक केंद्रे, लस,सॅनिटायझर , मास्क व वैद्यकीय उपकरणे व अशा सेवांना लागणारा कच्चा माल व त्याच्याशी सबंधित उत्पादन व वितरण. व्हेटरीनरी हॉस्पिटल्स, ऍनिमल केअर शेल्टर्स व पेट शॉप्स. दुध संकलन केंद्रे सकाळी 07.00 ते 09.00 वाजेपर्यंत सुरु राहतील. वितरणाबाबत फक्त घरपोच दुध वितरणास परवानगी असेल
शेती विषयक दुकाने बंद पण घरपोच सेवेस परवानगी
शिवभोजन थाळी योजना फक्त पार्सल सुविधा सुरु राहील.
अत्यावश्यक सेवा व वैदयकीय सेवा यासाठी, पेट्रोल/डिझेल पंप 24 तास चालू राहतील.
प्रसार माध्यमे, वृत्तपत्रे, मिडियाचे कर्मचारी, माल वाहतूक करणारी वाहने इ. साठीच सुरु राहतील.
विद्युत व गॅस पुरवठा सेवा, टेलीफोन सेवा.
अत्यावश्यक सेवा पुरविणाया कंपनींची कार्यालये
विमा/ वैद्यकीय हक्क सबंधित सेवाऔषध उत्पादन/ वितरण सबंधित नियोजन करणारी कार्यालय
बॅंकाही राहणार बंद
व्यापारी दुकाने व इतर सर्व दुकाने व आस्थापना बंद राहतील.
उपहारगृह, बार, लॉज, हॉटेल्स, रिसॉर्ट, मॉल,बाजार, मार्केट बंद राहतील.
भाजी मार्केट, फळ मार्केट, आठवडी व दैनंदिन बाजार, मंडई, फेरीवाले पूर्णपणे बंद राहतील. वाईन शॉप, बिअर शॉपी, देशी दारु दुकाने व तत्सम आस्थापना बंद राहतील
मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादींची विक्री पूर्णपणे बंद राहतील रस्त्याच्या कडेला असणारी खाद्य पदार्थ विक्रेते पूर्णपणे बंद राहतील
सर्व किराणा दुकाने, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते, सर्व इतर व्यवसाय करणारे व्यापरी दुकाने व इतर सर्व दुकाने व आस्थापना बंद राहतील.
सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती किरकोळ व ठोक विक्रीची ठिकाणे मोंढा/आडत भाजी मार्केट बंद राहतील.
सर्व भाजीपाला, बेकरी, फळ विक्रेते पूर्णपणे बंद राहतील.
माल वाहतूक व अत्यावश्यक सेवेतील वाहनांच्या दुरुस्तीसाठी गॅरेज, तसेच सदर वाहनांच्या स्पेअरपार्टचा पुरवठा स्पेअरपार्ट दुकाने पूर्णपणे बंद राहतील
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाव्दारे विहित केलेल्या सर्व सेवा बंद राहतील. सहकारी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम व खाजगी बँका व सहकारी बँका पूर्णपणे बंद राहतील
सर्व नॉन बँकिंग वित्तीय महामंडळे पूर्णपणे बंद राहतील
बांधकाम क्रिया पूर्णपणे बंद राहतील
नाटय़गृहे व सभागृहे बंद राहतील.
केशकर्तनालये / स्पा / सलून / ब्युटी पार्लर्स बंद राहतील.
सर्व धार्मिक प्रार्थनास्थळे बंद राहतील.
कारखान्यांना अटी व शर्ती
कारखान्यांना अटींचे बंधन
कारखाने व उत्पादनकेंद्रामध्ये कामगारांच्या प्रत्येक प्रवेशावेळी शरीराचे तापमान तपासणे बंधनकारक असेल आणि त्यांचेकडून कोव्हीड-19 च्या नियमांचे पालन करून घ्यावे. कारखाने व उत्पादनकेंद्रामध्ये काम करणाया कामगार अथवा कर्मचारी यांचा कोरोना चाचणी अहवाल + न आलेस, कारखाने व उत्पादन क्षेत्र व्यवस्थापनाने सदर व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीस पगारासह स्वखर्चाने विलगीकरणामध्ये ठेवावे. ज्या कारखाने/ उत्पादन केंद्रामध्ये 500 पेक्षा जास्त कामगार/ कर्मचारी काम करीत असतील अशा कारखाने/ उत्पादन केंद्र व्यवस्थापनाने स्वतःचे विलगीकरण केंद्र उभे करावे. सदर केंद्रामध्ये सर्व मुलभूत सुविधा असाव्यात आणि जर सदर सुविधा कारखाना परिसराच्या बाहेर असतील तर सर्व सुरक्षा उपाय करून कोरोना +न व्यक्तीस इतर कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात न येता त्या सुविधा केंद्रा पर्यंत घेवून जावे लागेल. एखादा कामगार बाधित आला तर कारखान्याचे निर्जुतीकरण होईपर्यंत बंद राहील.
वृत्तपत्र छपाई, वितरणास परवानगी
वर्तमानपत्रे / मासिके/ नियतकालिके छपाईस व वितरणास परवानगी असणार आहे. त्यांची घरपोच सेवाही सुरु ठेवण्यात आलेली आहे. वृत्तपत्र व नियतकालिकांच्या ठिकाणी काम करणाऱया कर्मचाऱयांचे केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावे.
पॉझिटिव्हीटी रेट 23 टक्क्यांवर
जिल्हय़ात गत पंधरावडय़ात दररोज नवनवे उच्चांक करणारे कोरोनाचे आकडे आता स्थिरावू लागले आहेत. गेल्या चार दिवसांत 1700 ते 1800 या दरम्यान कोरोना बाधितांची संख्या येत असल्याने सातारकरांना दिलासा मिळू लागला आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट आता ओसरेल अशी आशा सर्वांनाच लागली आहे. गेल्या आठवडय़ात जिल्हय़ाचा पॉझिटीव्ही रेट देशात अव्वल म्हणजे 45 टक्यांवर गेला होता. तोच रेट आता 23 टक्क्यांवर आला आहे. कोरोनाचा कमी होत असला तरी नागरिकांनी मात्र अजूनही काळजी घेण्याची गरज आहे. दरम्यान, नव्याने आलेल्या म्युकरमायकोसिसने मात्र धडकी भरायला सुरुवात झाली आहे. जिल्हय़ात 28 रुग्ण असून आजपर्यंत तिघांचे बळी गेले आहेत.
म्युकर मायकोसिसने चिंतेत भर
जिल्ह्यात नव्याने आढळून आलेल्यांमध्ये 1878 जण बाधित तर 31 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू आणि बाधित होण्यामध्ये सातारा तालुका आणि शहर सगळय़ात पुढे आहे. त्यातच आता म्युकर मायकोसिसचा धोका वाढू लागला आहे. जिल्याह्यात त्या आजाराचे 28 रुग्ण आहेत तर 3 रुग्णांचा बळी गेलेला आहे. जिल्हाधिकाऱयांच्या सुचनेनुसार नुकतीच एक बैठक पार पडली. त्या बैठकीनुसार जिल्हाधिकाऱयांच्या स्वाक्षरीने एक परिपत्रक काढण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र म्युकर मायकोसिस कक्ष सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
1878 नवे बाधित
जिह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1878 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 31 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या
शनिवार अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे. जावली 103 (6900), कराड 222 (20455), खंडाळा 88 (8959), खटाव 150(13129), कोरेगांव 220 (12773),माण 135(9945), महाबळेश्वर 7 (3833), पाटण 46(5988), फलटण 332 (20283), सातारा 395 (32646), वाई 169 (10833 ) व इतर 11 (912) असे आजअखेर एकूण 146656 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
सातारा येथे 8 बाधितांचा मृत्यू
आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आजअखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे. जावली 3 (151), कराड 6(593), खंडाळा 0 (122), खटाव 6 (366), कोरेगांव 2 (292), माण 3(194), महाबळेश्वर 0 (42), पाटण 0 (145), फलटण 2 (241), सातारा 8 (958), वाई 1(286), व इतर 0, असे आज अखेर जिह्यामध्ये एकूण 3390 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
1663 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज
सातारा जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 1663 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
शनिवारी जिल्ह्यात
बाधित….1878
मृत….31
मुक्त…..1633
शनिवारपर्यंत जिल्ह्यात
एकूण नमुने…672792
एकूण बाधित….146656
घरी सोडण्यात आलेले…125433
मृत्यू….3390
उपचारार्थ रुग्ण….17820