प्रतिनिधी / सातारा
शहरात अनेक इमारती अनधिकृतपणे बांधकाम परवानगीशिवाय सुरू आहेत. तर काही इमारती परवानगी वेगळी आणि बांधकाम भलतेच सुरू असते. शहरात बेकायदेशीर टपऱ्या टाकलेल्या आहेत. गुंड त्यावर हप्ते गोळा करतात. त्याकरता अतिक्रमण हटवण्यासाठी मुख्याधिकारी म्हणून कार्यवाही करावी तसेच शहरात दर्जाहीन होत असलेली कामे रोखण्यात यावीत, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे करण्यात आली आहेत.
मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांना शिवसेनेने यापूर्वी दिलेल्या निवेदनाची आठवण करून देण्यासाठी भेट घेऊन चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांच्या केबिनमध्ये नगरसेवक मनोज शेंडे, अविनाश कदम हे ही उपस्थित होते. बाळासाहेब शिंदे म्हणाले, मुख्याधिकारी म्हणून तुम्हाला सातारा शहर नवीन नाही. परंतु तुमच्या बदली नंतर शहरात सगळी अंधाधुंदी झाली आहे. रस्त्याची कामे खराब दर्जाची होत आहे. कामे पूर्ण करण्याआधी बिले काढली आहे.
मोती चौकात पेव्हर टाकले. केवळ चार उखडले पूर्वीचे पेव्हर का काढले गेले?, शहरात अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर आहेत. ती काढली जात नाहीत. कोरोनाच्या काळात अनेक चुकीच्या बाबी पालिका प्रशासनाकडून घडत आहेत.त्याबाबत निवेदन देऊन ही कार्यवाही झाली नव्हती तुमच्याकडून कार्यवाही व्हावी अशी मागणी केली आहे.