प्रतिनिधी / नागठाणे
गेल्या काही दिवसांपासून उरमोडी नदीपात्रात रसायनयुक्त पाणी सोडण्यात आल्यामुळे नदीचे पाणी दूषित व दुर्गंधीयुक्त झाले असून नदीतील मासे मृत झाले आहेत. या नदीकाठी असलेल्या गावोगावच्या पिण्याच्या पाणीपुरवठा विहिरीमध्येही या दूषित पाण्याचे परकुलेशन होत असल्याने या स्कीमाही धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांमधील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. नदीत रसायनयुक्त पाणी सोडणाऱ्यांवर शासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी येथील जनतेतून होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून उरमोडी नदीमध्ये धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. मात्र या सोडलेल्या पाण्यामध्ये रसायनयुक्त पाणी मिसळल्याने वळसे ते काशीळ दरम्यानचे पाणी काळसर झाले असून त्यातून भयानक दुर्गंधीही पसरली आहे.या रसायनयुक्त पाण्यामुळे उरमोडी नदीमधील मासेही मृत झाले असून नदीकाठी जागोजागी मृत माश्यांचा खच पडला आहे.त्यातच अश्याही परिस्थितीत काही लोक या नदीमध्ये मासे पकडून बाजारात विकत आहेत. त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या उरमोडी नदीकाठी अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीही आहेत. सध्या नदीतील हे रसायनयुक्त दूषित पाणी परकुलेश होऊन य पाणीपुरवठा विहिरीतही येत आहे. आणि हेच पाणी पुढे गावात वितरित होत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या आरोग्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. उरमोडी नदीपात्रात रसायनयुक्त पाणी सोडून परिसरातील जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्याना जिल्हा प्रशासनाने शोधून काढावे व त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी या परिसरातील जनतेतून होत आहे.