औंध/ प्रतिनिधी
आपल्या मर्दुमकीने पहिले हिंदकेसरी होण्याचा बहुमान मिळवणारे हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांच्या निधनाने कृष्णाकाठ गहिवरला आहे. अनेक कुस्तीशौकिन आणि मल्लांनी तीव्र शोक व्यक्त केला.
कुस्तीक्षेत्रात महाराष्ट्राची मान देशात उंचावण्यात खंचनाळे आण्णांनी मोठे योगदान दिले आहे.
आपल्या आयुष्याच्या शिदोरीतील अनेक अनुभव मला त्यांनी दिले. आमची जेव्हा जेव्हा भेट व्हायची तेव्हा ते कुस्तीबद्दल भरभरून बोलायचे. नवीन पिढी बलदंड घडली पाहिजे यासाठी त्यांची तळमळ होती. आपल्या कर्तबगारीने त्यांनी लोकांचे प्रेम मिळवले मात्र शासन दरबारी ते शेवटपर्यंत उपेक्षित राहिले याची मोठी खंत हिंदकेसरी संतोष आबा वेताळ यांनी व्यक्त केली.
शासनदरबारी महाराष्ट्र केसरी हिंदकेसरी यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आण्णांनी नेहमीच पुढाकार घेतला होता. कुणाचा मुलाहिजा न बाळगता ते आपले म्हणणे स्पष्टपणे मांडत असत. प्रतिकूल परिस्थितीतही कठोर परिश्रमाने यशाची उंची गाठता येते हे त्यांनी दाखवून दिले. कुस्ती क्षेत्रातील महान तपस्वी हरपल्याची भावना डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केली.
खंचनाळे आण्णा मोठे धाडसी पैलवान होते. आत्मविश्वासाच्या जोरवर त्यांनी उत्तर भारतातील मल्लांचा सामना केला. बलदंड शरीरयष्टी असली तरी ते मैदानात चपळाईने लढत असत. आमच्या सारख्या मल्लांना त्यांच्या सहवासातून उर्जा मिळायची. ते कडक शिस्तीचे होते. खास करून आयुर्वेदाचा त्यांचा गाठा अभ्यास होता. कुस्तीगीर महान मार्गदर्शकारला मुकल्याची भावना धनाजी पाटील आटकेकर यांनी व्यक्त केली .
हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांच्या निधनाबद्दल सैदापूर येथील महाराष्ट्र केसरी स्व. संजयदादादा पाटील कुस्ती संकुलातील मल्लांनी देखील त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.