प्रतिनिधी/ सातारा
सध्या कोरोनाचा संसर्ग कमी होण्याचा दिलासा मिळत असताना गुन्हेगारीचा आलेख वाढू लागला आहे. साताऱयात आरटीओ चौकात फळविक्रेत्यांमधील किरकोळ भांडणातून जमाव जमवून दोन फळविक्रेत्यांना भरदिवसा बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. यामध्ये हे दोन फळविक्रेते जखमी झाले असून त्यांच्या फळांचा माल, इलेक्ट्रीक वजनकाटय़ाची नासधूस करत जमावाने त्यांच्या गल्ल्यातील पैसे लंपास केले आहेत.
संतोष सदाशिव फाळके (रा. गोडोली, सातारा) व त्यांचा मित्र राजेंद्र पोपट डुबल (रा. मंगळवार पेठ, सातारा) हे दोघे पार्टनरशिपमध्ये फळविक्रीचा व्यवसाय गेल्या 10 ते 15 वर्षांपासून करत आहेत. जुन्या आरटीओ चौकात त्यांचा फळविक्रीचा गाडा असतो. दि. 4 रोजी तिथे नवीन आलेला एक फळविक्रेता राजेंद्र डुबल यांच्याकडे पाहून सारखा हसत होता. त्यामुळे त्यांनी त्या नवीन आलेल्या फळविक्रेता युवकाला सारखा का हसतोयस म्हणून विचारणा केली.
या किरकोळ कारणातूनच या दोघांना नावही माहिती नसलेल्या त्या दुसऱया फळविक्रेत्या युवकाने वाद वाढवत नेला. सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मोठय़ा वाहनातून त्याच्या इतर मित्रांना सोबत आणून त्याने फाळके व डुबल यांच्या फळविक्रीच्या स्टॉलसह या दोघांवर हल्ला चढवला. यावेळी शिवीगाळ करत कोणत्या तरी शस्त्राने वार केल्याने फाळके व डुबल जखमी झाले आहेत. ते तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले होते रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
दरम्यान, आपला व्यवसाय भला आणि आपण भले असे हे दोन मित्र एवढी वर्षे काम करत असताना नवीन आलेल्या फळविक्रेत्या युवकाने किरकोळ कारणातून आम्हाला मारहाण केली. आमच्या मालाची नासधूस केली तसेच गल्ल्यातील पैसेही चोरुन नेले असल्याचे संतोष फाळके यांनी ’तरुण भारत’ शी बोलताना सांगितले. भरदिवसा आरटीओ चौकात हे रणकंदन सुरु होते. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. यातील दुसऱया फळविक्रेत्या युवकाने साथीदारांना आणून जमाव जमवत मारहाण करणाऱया त्या फळविक्रेत्या युवकाचे नाव देखील त्यांना ठावूक नसताना असा भांडणाचा प्रसंग आल्याने ते तणावाखाली होते.