प्रतिनिधी / सातारा :
मोदी हटाओ…देश बचाओ…, मोदी सरकारचा धिक्कार असो…, अशा घोषणा देत महाविकास आघाडीने सोमवारी सकाळी मोर्चा काढून लखीमपूर घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारुन जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. दुकाने बंद करण्याचे आवाहनही यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले.
महाविकास आघाडीच्या मोर्चाला सकाळी 10 वाजता राजवाडय़ापासून सुरवात झाली. मोती चौकमार्गे पाचशेएक पाटी, पोलीस मुख्यालयमार्गे पोवई नाका जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तिन्ही पक्षांच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. तेथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले, केंद्र शासन आणि उत्तरप्रदेश शासन यांनी शेतकऱ्यांचा कट रचून निघृणपणाने हत्या केली आहे. शेतकरी आंदोलन मोडीत काढणे, या देशाचा कणा असणारा शेतकरीवर्ग, राजकीय स्वार्थासाठी मुठभर लोकांच्या तुबंडय़ा भरण्यासाठी शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे कटकारस्थान गेल्या तीन वर्षांपासून या देशात सुरु आहे. देशातील कष्टकरी बांधव, सामान्य जनतेच्यावतीने लखीमपुर घटनेचा आम्ही निषेध करतो. यातील अपराध्यांना शासन झाले पाहिजे. केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला नाही तर हे आंदोलन तीव्र करु असा इशाराही त्यांनी दिला.
या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, राष्ट्रवादीचे युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, युवती सेलच्या प्रदेश सरचिटणीस स्मिता देशमुख, युवती सेलच्या जिल्हाध्यक्षा पुजा काळे, नागेश साळुंखे, शफिक शेख आणि कार्यकर्ते सहभाग झाले होते.