मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ मडगाव
राजकारणासारख्या क्षेत्रात नेतृत्व करण्यासाठी जसे अनेकजण पुढे येतात त्याचप्रमाणे सामाजिक, आर्थिक यासारख्या क्षेत्रातही आज नेतृत्वाची गरज आहे आणि ही पोकळी आजचा युवक भरुन काढेल, अशी आपण आशा बाळगतो असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले आहे. त्याचबरोबर युवकांनी प्रत्येक गोष्टीमागील सत्य जाणून घेऊन आपले मत मांडावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कोकणी भाषा मंडळाने काल शुक्रवारी मडगावात आयोजित केलेल्या 25 व्या युवा महोत्सवात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. यावेळी व्यापसपीठावर मुख्यमंत्र्याव्यतिरिक्त कोकणी भाषा मंडळाचे अध्यक्ष चेतन आचार्य, टाटा उद्योग समुहाचे संचालक प्रवीण काडले, मडगावच्या नगराध्यक्ष पूजा नाईक, वल्लभ बर्वे, धेंपे उद्योग समूहाच्या कार्यकारी संचालक तथा या महोत्सवाच्या स्वागताध्यक्षा पल्लवी धेंपे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
गोव्याचे हित पाहणे पाहिजे सर्वप्रथम कर्तव्य
यावेळी बोलताना डॉ. सावंत म्हणाले की आपण मुख्यमंत्री आहे तो गोव्याच्या हितासाठी आहे. गोव्याचे हित पाहणे हे आपले सर्वप्रथम कर्तव्य आहे. कोकणी क्षेत्रातील कार्य अजुनही वाढले पाहिजे. कोकणी भाषा मंडळ या भाषेच्या वृद्धीसाठी जे कार्य करीत आहे ते कार्य खरोखरच कौतुकास पात्र आहे. येत्या 25 वर्षासाठी विविध कार्यक्रमांची आखणी करणे तितकेच गरजेचे असल्याचे सांगून लवकरच राजभाषा संचालनालयासाठी पूर्णवेळ संचालक मिळणार असेही त्यांनी स्पष्ट केले.
जगाच्या अनेक भागांमध्ये कोकणीप्रेमी
कोकणीप्रेमी फक्त गोव्यातच नव्हे तर संपूर्ण जागाच्या विविध भागांमध्ये विखुरलेले आहेत आणि ती मंडळी कोकणी भाषा मंडळाची आणि कोकणी भाषेची काळजी घेणार यात शंका नाही, असेही ते म्हणाले.
अनुदान वाढविण्यासाठी प्रयत्न करणार
सरकार गोव्याच्या विविध संघटनांना अनुदान देत असते. कोकणी भाषा मंडळालाही सरकार अनुदान देते आणि हे अनुदान आता अपुरे पडत आहे याची जाणीवही या सरकारला आहे. हे अनुदान कसे वाढविता येईल त्याबाबतीत प्रयत्न केले जातील, असे आश्वासन डॉ. सावंत यांनी यावेळी दिले.
सरकारवरच बोलले पाहिजे असे नाही
युवा महोत्सवात अनेक विषयावर चिंतन, मनन केले जाते हा धागा धरुन मुख्यमंत्री म्हणाले की कोणीही कितीही टीका केली तरी आपण त्या टिकेला भीक घालत नाही. टीका करावीच. ही लोकशाही आहे. भारत हा सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. सर्वाना बोलण्याचा अधिकार आहे. टीकाही करण्याचा अधिकार आहे. मात्र, बोलताना सरकारवरच बोलले पाहिजे असे नाही. गोव्याच्या अनेक प्रश्नावर राजकारणी, पर्यावरणप्रेमी तसेच निम सरकारी संघटनाही बोलत असतात.
पर्यावरणाचा ऱहास गोवेकरांना परवडणार नाही
विद्यमान सरकार जनतेच्या अडीअडचणी ऐकून घेणारे सरकार आहे. आपण गोव्याचा मुख्यमंत्री असल्याने गोव्याच्या हिताचा विचार करतो. अनेकांनी सूचना मांडल्या, त्यातील काही गोव्य़ाच्या हिताच्या असल्याने सरकारने स्वीकारल्या. गोव्याचा निसर्गही जगला पाहिजे. गोव्यात पर्यटक येतात ते पर्यावरणासाठी येत असतात. पर्यारवणाचा ऱहास झालेला गोवेकरांना परवडणारा नाही. पर्यावरणासंबंधी काळजी जशी सरकारला आहे तशी काळजी संपूर्ण गोवेकरांचीही आहे. ही जबाबदारी गोव्याच्या सर्व युवकांनी आपल्या खांद्यावर घ्यावी, असे त्यांनी यावेळी आवाहन केले.
मोपा विमानतळ म्हणजे युवकांना करिअर संधी
आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळासंबंधीचा खटला सरकारने जिंकला आहे. 2022 पर्यंत हे विमानतळ पूर्णही होईल. गोव्याचा आर्थिक भार मोपा विमानतळ उचलणार आहे. गोव्यातील युवकांना जास्तीत जास्त नोकऱया मोपाच्या माध्यमातून दिल्या जाऊ शाकतात. म्हणून करिअरच्या दृष्टीने आजच्या युवकांसाठी हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे. गोव्यात अनेक प्रकल्प पर्यावरणवाद्यानी बंद पाडले. त्यात मोपाही आला. आजच्या युवकांनी अशा प्रश्नावर चर्चा करावी आणि सत्य काय ते ओळखावे असे आवाहन डॉ. सावंत यांनी यावेळी केले.
युवकांनी सत्य जाणून घेऊन मत व्यक्त करावे
एखादा विषय एखाद्यासमोर चुकीच्या पद्धतीने मांडला आणि जर त्या व्यक्तीला त्या विषयातील काहीच माहिती नसेल तर ती व्यक्ती ती चुकीची संकल्पना आपल्या मनात रुजवेल. म्हणून अशा विषयात युवा वर्गाने सत्य काय आहे ते जाणून घ्यावे अणि नंतरच आपले मत व्यक्त करावे. हे मत व्यक्त करणे तितकेच आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
चर्चेतून प्रश्नांची गहनता स्पष्ट होणार
गोवा सांभाळायला पाहिजे आणि गोव्याची अस्मिता पुढे न्यायची असेल तर वरील बाबी सांभाळणे तितकेच गरजेचे आहे. निसर्गासारख्या बाबीवरही चर्चा होणे तितकेच गरजेचे आहे. चर्चा होणार तेव्हाच अशा प्रश्नांची गहनता युवा पिढीला पटणार आहे. काय खरे आणि काय खोटे याचाही या पिढीला उलगडा होईल, डॉ. सावंत पुढे म्हणाले.
गोव्यात सामाजिक, आर्थिक तसेच इतर विविध क्षेत्रात नेतृत्व प्राप्त झाले पाहिजे. अशा प्रकारचे नेतृत्व तयार होण्यासाठी आजच्या युवकांनी आज पुढे येण्याची गरज असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
राज्य सरकारच्या भाषा संचालनालयावर बरीच टीका होत असते. या भाषा संचालनालयाला माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बरेच साहाय्य केलेले आहे. यासाठी लवकरच पूर्णवेळ संचालक मिळेल व गोव्यातील भाषेसाठी योग्य तो न्याय मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.