रामनाथ नाईक यांचे प्रतिपादन : कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघातर्फे गुरुवंदना कार्यक्रम
बेळगाव :
येथील कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघातर्फे गुरुवंदना कार्यक्रम बी. के. मॉडेलच्या सभागृहात संपन्न झाला.
आई पहिली गुरु, त्यानंतर शाळा-कॉलेजमध्ये शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावत असून समाज हा आपला अंतिम गुरू आहे. कारण समाजातच आपण यश किंवा अपयशी ठरतो. वेदकाळापासून आजपर्यंत संस्कारुपी ज्ञान आणि सक्षम होण्याची ताकद आम्हाला गुरुंच्या माध्यमातून मिळाली आणि मिळत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा ग्रामसेवा प्रमुख रामनाथ नाईक यांनी केले. गुरुवंदना कार्यकमात त्यांनी बौद्धिक प्रकटन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून तरुण भारत सोशल मीडिया टीमचे प्रसाद एस. प्रभू, साई सौहार्द सोसायटीचे चेअरमन रोहित पोरवाल, प्रमुख वक्ते संघ जिल्हा ग्रामसेवक प्रमुख रामनाथ नाईक, राज्य उपाध्यक्षा रोहिणी नाईक आणि बी. के. मॉडेलच्या मुख्याध्यापिका शीला चाटे उपस्थित होत्या.
प्रारंभी भारतमाता आणि महषी व्यासांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पार्जन करण्यात आले. प्रास्ताविक आणि ओळख सचिव उमेश कुलकर्णी यांनी करून दिली. स्वागत सुरेश कळ्ळेकर, प्रवीण पाटील, संजीव कोष्टी यांनी केले. सेवानिवृतीबद्दल शिक्षक संघाचे संचालक दयानंदन तारिहाळकर यांचा सत्कार करण्यात आला. शिक्षकी पेशातून केलेल्या कार्याबद्दल कौतुक करण्यात आले. दहावीच्या विद्यार्थ्यांना फोन ईन कार्यक्रमाद्वारे मार्गदर्शन करणाऱया 75 शिक्षकांचा प्रशस्तीपत्रांसह भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. शिक्षकांना खरी वंदना मिळाली, असे समाधान प्रत्येकाच्या चेहऱयावर पहावयास मिळाले.
तरुण भारतच्या प्रसाद सु. प्रभू यांनी माध्यमाच्या कामगिरीची माहिती दिली. शिक्षण आणि तरुण भारत वेगळे नाही. बाबुराव ठाकुर यांनी याचा पाया 1919 रोजी घातला. प्रत्येक खेडोपाडी शाळा सुरू करून ज्ञानगंगा सगळीकडे पोहोचविली. तेच व्रत घेऊन आम्ही पुढ जात आहोत, असेही ते म्हणाले. रोहित पोरवाल यांनी शिक्षकवर्गाला वंदन करून शुभेच्छा दिल्या.
बढती मिळाल्याबद्दल बी. के. मॉडेलच्या शीला चाटे, गोमटेश हायस्कूलचे सुनील पाटील आणि महिला विद्यालयाच्या व्ही. एन. पाटील यांना शुभेच्छा देण्यात आल्या. अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी आम्ही स्वतःमध्ये आदर्शवत बदल घडवून आणल्यास विद्यार्थीसुद्धा त्याच मार्गावरून जातील. शिक्षक संघ निरंतर शिक्षक, शिक्षण आणि समाजाचा विचार करत असतो. तुम्हीही या चळवळीत सामील व्हा म्हणजे राष्ट्रसेवेत आणखी एक पाऊल पुढे जाता येईल, असे म्हणाले.
यावेळी आर. आर. कुडतूरकर, नवीना शेट्टीगार, सरस्वती देसाई, विश्वास गावडे, रणजित चौगुले, राहुल परमोजी, संजय नरेवाडकर, विश्वजित हसबे, उमेश बेळगुंदकर, विजय पार्लेकर, वामन कुलकर्णी आदी मुख्याध्यापकांसह बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन सुभाष बराटे आणि आर. एस. भट यांनी केले. आभार प्रदर्शन व्ही. एन. पाटील यांनी केले.