संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांचा इशारा
प्रतिनिधी / बेंगळूर
देशाच्या संरक्षणासाठी आत्मनिर्भर होणे देशहिताचे ठरणार आहे. देशात संरक्षण सामग्रीचे उत्पादन आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालून आपण याही क्षेत्रात स्वावलंबी होतोय आणि त्यासाठी केंद्र सरकार गांभीर्याने प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी बेंगळूर येथे बुधवारी केले. तसेच सार्वभौमत्व रक्षणासाठी कोणाशीही झुंज देण्याची भारताची तयारी असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तसेच देशातील तंत्रज्ञ आणि संशोधकांच्या अफलातून यशाच्या बळावर भारत भविष्यात संरक्षण सामुग्रीचा निर्यातदार देश बनेल असाही विश्वास राजनाथ यांनी यावेळी व्यक्त केला.
बेंगळूरमध्ये बुधवारपासून एअरो शोला प्रारंभ झाला. या प्रदर्शनाच्या निमित्ताने येथे दाखल झालेल्या संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते तेजस लढाऊ विमानांच्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) दुसऱया उत्पादन युनिटचे उद्घाटन करण्यात आले. आपण कधीपर्यंत संरक्षण सामग्रीसाठी दुसऱया देशांवर अवलंबून राहायचे असा सवालही त्यांनी या उद्घाटन सोहळय़ात बोलताना केला. त्यादृष्टीने ‘आत्मनिर्भर भारत’च्या माध्यमातून संरक्षण क्षेत्रही उत्तुंग झेप घेत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
संरक्षण क्षेत्रातही ‘आत्मनिर्भर भारत’चा संकल्प आम्ही पूर्ण केला आहे. स्वदेशी तेजसच्या निर्मितीने भारतही शक्तिशाली लढाऊ विमाने बनवू शकतो हे आम्ही जगाला दाखवून दिले आहे. तेजस केवळ स्वदेशी लढाऊ विमान म्हणून नव्हे, तर ते अनेक जागतिक मापदंडाला साजेसे ठरल्याचा सार्थ अभिमान संरक्षण दलाला आहे. तेजसच्या इंजिनाची क्षमता, हायटेक रडार आणि किंमतीमध्ये तेजसने आपली उपयुक्तता सिद्ध केली असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
भविष्यात अन्य देशांनाही लढाऊ विमानांचा पुरवठा
तेजससारख्या हायटेक आणि शक्तिशाली लढाऊ विमानांची निमिर्ती करण्यात भारतीय संशोधक-तंत्रज्ञ यशस्वी ठरले आहेत. पण भविष्यात जगातील अन्य देशांनाही तेजससारख्या लढाऊ विमानाचा पुरवठा भारत करू शकेल. आमचा हिंदुस्थान एरॉनॉटिक्सच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे, असेही संरक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले.