प्रतिनिधी/ सांगे
सांगे तालुक्मयातील डोंगरमाथ्यावर वसलेल्या साळजिणी येथील रस्त्याचे सध्या तीन तेरा वाजले असून त्यातच प्रचंड प्रमाणात कोसळणाऱया पावसामुळे येथील लोक अक्षरशः हैराण झाले आहेत. स्थानिक प्रशासनाने पावसाळय़ापूर्वी रस्त्याचे काम करून देणार असल्याचे सांगितले होते. पण कोविड-19 मुळे ते शक्मय झाले नाही.
नेत्रावळी ग्रामपंचायत क्षेत्रातील दुर्गम भागात राहणाऱया या लोकांच्या नशिबी निराशाच आली आहे. मुळात नेत्रावळी अभयारण्यातून जाणारा वेर्ले ते साळजिणी हा रस्ता डांबरीकरण करण्यास घेतला होता, पण त्याची दुर्दशा संपता संपेना अशी स्थिती आहे. सध्या या रस्त्यावरून मोठय़ा प्रमाणात डोंगरावरून येणारे पाणी वाहत असून याच पाण्यातून वाट काढत लोकांना जावे लागते. या रस्त्यावर एकमेव कदंब बस वाहतूक करत आहे. रस्त्याच्या बिकट परिस्थितीमुळे बसचालकाला तारेवरची कसरत करावी लागते.
या रस्त्यावरून दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन जाणे म्हणजे जिकिरीचे आहे. वेर्लेपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरात रस्ता साधारण चांगला आहे. पुढे मग स्थिती गंभीर आहे. मुळात रस्त्याची सुधारणा व डांबरीकरण करताना कंत्राटदाराने अनेक ठिकाणी पाणी वाहून जाण्यासाठी पाईप टाकून वाट करून दिली नाही. साळजिणी येथील लोकांनी रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचे कारण पुढे करून मार्चमध्ये होऊ घातलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता.
दुरुस्तीच्या प्रस्तावाला अद्याप मंजुरी नाही
त्यानंतर स्थानिक प्रशासनाने लक्ष घालून या लोकांची दक्षिण गोवा जिह्याधिकारी अजित रॉय यांच्याबरोबर बैठक झाली होती. त्यात रस्त्याची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत करून घेण्याचे ठरले होते. पण मार्चपासून कोरोना महामारीने डोके वर काढल्याने हा विषय बाजूला पडला. तसेच शासनाने रस्ता दुरुस्त करण्याच्या अंदाजित खर्चाच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली नाही, अशी माहिती मिळाली आहे.
वास्तविक वन खात्याने अशा रस्त्याची दुरुस्ती व देखभाल करण्याची गरज आहे. पावसाळय़ापूर्वी पाणी वाहून जाण्यासाठी वाट करून दिली असती, तर इतकी बिकट परिस्थिती झाली नसती. हा अत्यंत जुना रस्ता असून एकेकाळी या रस्त्यावरून खनिजमालाची वाहतूक होत होती. कोविडचे संकट कधी संपेल हे सांगता येणार नाही. मात्र सरकारने कोविडच्या निर्बंधांतून सूट देऊन सदर रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाचा प्रस्ताव मंजूर करणे आवश्यक आहे, असे मत लोकांकडून व्यक्त होत आहे.
शेतीचेही नुकसान
सार्वजनिक बांधकाम खात्याने सदर रस्त्याची दुरुस्ती करण्याबरोबरच ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे व रस्त्यावरून पाणी वाहून जाते तेथे पाईप टाकून पाण्याला वाट करून देणे तसेच आवश्यक ठिकाणी काँक्रिट टाकणे किंवा पेव्हर्स बसविणे आदी कामांचा या प्रस्तावात समावेश आहे. दरम्यान, यंदा मुसळधार पाऊस सतत पडल्याने साळजिणी येथील शेती वाहून गेली तसेच पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. या समस्येकडेही सरकारने गंभीरपणे लक्ष देण्याची मागणी होत आहे.