केसरी योजनेची पाईपलाईन फुटल्याने समस्येत भर : नागरिकांची पालिकेत धाव
टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ : काही भागात उद्यापर्यंत पाणी नाही
प्रतिनिधी / सावंतवाडी:
सावंतवाडी शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या नागरिकांना भेडसावत असतानाच संस्थानकालीन पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याने शहरात अनेक प्रभागातील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. पाणी नसल्याने नागरिकांनी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे धाव घेतली. त्यावेळी केसरी येथील संस्थानकालीन पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन फुटल्याचे स्पष्ट झाले. पिण्याच्या पाण्यासाठी महिलाही आक्रमक झालेल्या दिसल्या. नागरिकांना टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची हमी पाणीपुरवठा विभागाने दिली.
दरम्यान, पाणीपुरवठा विभागाने पिण्याचे पाणी घेऊन टँकर रवाना केले. पाईप लाईन दुरुस्तीचे काम नगरपालिकेने युद्धपातळीवर सुरू केले आहे. मात्र, एक आणि दोन एप्रिलला काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर पुढील काही दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे पालिकेने कळविले आहे.
शहरात अनेक ठिकाणी पाणी मिळत नसल्याचा आरोप विरोधी शिवसेना करत आहे. तर शहरात पाणीपुरवठा सुरळीत असल्याचा दावा भाजप करत आहे. पिण्याच्या पाण्यावरून आरोप-प्रत्यारोप होत असतानाच पाईपलाईन फुटल्याने सत्ताधारी भाजप तथा नगराध्यक्ष संजू परब यांच्यावर टीका करण्याची आणखी एक संधी विरोधकांना मिळाली आहे.
टँकरने पाणीपुरठय़ात पालिकेची दमछाक
केसरी येथील नळयोजना संस्थानकालीन आहे. 125 हून अधिक वर्षे या योजनेला झाली आहेत. येथून दररोज शहराला पाच लाख लिटर पाणीपुरवठा होतो. केसरीतून नैसर्गिक जलस्रोताचे पाणी पाईपलाईनने चिवार टेकडीतील टाकीत जमा करून ते शहरात वितरित करण्यात येते. या योजनेची पाईपलाईन केसरी येथे फुटली. त्यामुळे शहरातील सबनीसवाडा, बाहेरचावाडा, काजरेकर घरापासून हॉस्पिटल, खासकीलवाडा, म्हादळभाट, कामत लाईन, रसाळ पाणंद, तिलारी रोड, समाज मंदिर परिसर, जिमखाना मैदान, गोठण, वजरवाडी, नाडकर्णी पाणंद, चराठे ग्रामपंचायत भागात दोन एप्रिलपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यानंतर दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. ऐन उन्हाळय़ात पाणीपुरवठा बंद झाल्याने नागरिकांची पाण्यासाठी धावाधाव सुरू झाली आहे. नागरिक पालिकेत धाव घेत आहेत. नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची ग्वाही देण्यात येत आहे. तसेच टँकरही पाठविण्यात येत आहेत. परंतु काही प्रभागात पाण्याची समस्या यापूर्वीच असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे स्थिती बिकट बनली असून टँकरने पाणी पुरविताना पालिकेची दमछाक होत आहे.
पाईपलाईनची समस्या खरीच आहे का?
कुणकेरी पाळणेकोंड नळयोजनेची पाईपलाईन जुनी झाली आहे. त्यामुळे सुधारित 46 कोटीची नळयोजना प्रस्तावित आहे. हा निधी मिळून काम सुरू कधी होणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. असे असतानाच आता केसरीतील पाईपलाईन जुनी असल्याने तीदेखील बदलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. परंतु तोपर्यंत नागरिकांना या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. असे असले तरी पाईप लाईनची समस्या खरीच आहे का, याचाही अभ्यास होण्याची आवश्यकता आहे.