प्रतिनिधी/मिरज
शहरातील एक प्रसिध्द तंतुवाद्य आणि ढोल व्यावसायिक सावकारीच्या त्रासाला कंटाळून बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी शहर पोलिसांत दिली आहे. सदर व्यावसायिकाने बेपत्ता होण्यापूर्वी चिठ्ठीही लिहूल ठेवली आहे. त्यामध्ये शहरातील आठ खासगी सावकारांची नांवे असल्याचे समजते. शहरात खासगी सावकारांनी पुन्हा डोके वर काढल्याचे यावरुन उघडकीस आले आहे.
मिरज शहर हे तंतुवाद्य निर्मितीसाठी जगभरात प्रसिध्द आहे. याच तंतुवाद्य निर्मितीचा व्यवसाय करणारे आणि त्याचबरोबर ढोल-ताशा पथकांसाठी ढोल विक्री करणारे एक तरुण व्यवसायिक गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता झाले आहेत. त्यांनी व्यवसायासाठी सुमारे 70 लाखांचे कर्ज काढल्याचे समजते. सदर तरुणाचा व्यवसाय हा प्रसिध्द होता. त्यांच्या ढोल-ताशा साहित्याची विक्री महाराष्ट्रात ठिकठिकाणी होत असे. त्यांनी शनिवार पेठेत दोन-तीन दुकानेही विकत घेतली होती. तंतूवाद्य आणि ढोल-ताशाचा साठा करण्यासाठी त्यांचे मोठे गोडावूनही आहे.
मात्र, त्यांनी या व्यवसायासाठी खासगी सावकारांकडून कर्ज काढले होते. या सावकारांनी काही कोरे कागदही त्यांच्याकडून लिहून घेतले होते. गेल्या काही महिन्यात व्यवसायात थोडफार मंदावला असल्यामुळे या कर्जाची परतफेड करण्यास त्यांना विलंब होत होता. मात्र, खासगी सावकारांनी त्यांच्याकड तगादा लावला होता. या तगाद्याने ते हैराण झाले होते. दोन दिवसांपूर्वी ते अचानक घरातून बेपत्ता झाले. त्यांनी एक चिठ्ठीही लिहून ठेवल्याचे समजते. या चिठ्ठीत त्यांनी शहरातील आठ सावकारांची नांवे लिहून ठेवली आहेत. दोन दिवस संबंधीत व्यावसायिक घरी आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी मिरज शहर पोलिसात धाव घेतली आहे. संबंधीत चिठ्ठी शहर पोलिसांना दाखविली असल्याचे सांगण्यात आले.
या घटनेने सतारमेकर व्यावसायिकात खळबळ माजली आहे. शहरात खासगी सावकारीतून गेल्या दोन-तीन वर्षात एका दाम्पत्याचा बळी गेला होता. तर काही तरुणांनी घर सोडले होते. सतारमेकर व्यावसायिक खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून बेपत्ता झाल्याने पुन्हा शहरातील खासगी सावकारीचा काळा चेहरा उघड झाला आहे. या खासगी सावकारीला आळा घालावा, अशी मागणी नागरिकातून होत आहे.