गोवा राज्यापेक्षा भौगोलिक आकाराने दुप्पट असलेला महाराष्ट्र राज्यातला सिंधुदुर्ग जिल्हा पश्चिम घाटाने व्यापलेला असून जैविक संपदेची श्रीमंती मिरवित आहे. येथील कष्टकरी समाजाने आपल्या परिसरातील निसर्ग आणि पर्यावरणाशी स्नेहबंध राखून आपले जगणे समृद्ध करण्याचा पूर्वापार प्रयत्न केलेला आहे. आदिम अवस्थेत वावरताना इथल्या मानवाने जंगली श्वापदांचे मांस भक्षण करण्याबरोबरच रानटी फळे, फुले, पाने, कंदमुळे यांचा अन्न म्हणून उपयोग केला होता. आज औद्योगिकीकरण आणि नागरिकीकरणाची प्रक्रिया झपाटय़ाने सिंधुदुर्गसारख्या परिसराचा कायापालट करत असताना वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण गावडे यांना 2,200 पेक्षा जास्त वनस्पती प्रजातीत 350 औषधी, 113 रंग देणाऱया, 55 अति दुर्मीळ तर किमान 60 वनस्पती या रानभाज्या बनल्याचे संशोधनाअंती दृष्टीस पडलेले आहे. निसर्गात मोसमानुसार उपलब्ध होणाऱया रानभाज्यांचा वैविध्यपूर्ण आणि समृद्ध वारसा ज्ञात व्हावा म्हणून वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण गावडे आणि आयुर्वेदाचार्य डॉ. नीलेश कोदे यांनी आरंभलेली मेहनत हळवळ, कणकवलीतील वामन पंडित यांनी कोरोना विषाणूच्या संकटकाळात एका सुंदर पुस्तकाच्या माध्यमातून समोर आणलेली आहे.
वनस्पती वर्गीकरण शास्त्रानुसार वेंगुर्ला येथील वृक्ष आणि वनस्पतीच्या अभ्यासासाठी मुंबई विद्यापीठाची डॉक्टरेट मिळविणाऱया डॉ. बाळकृष्ण गावडे यांनी चौकुळ तसेच ऐतिहासिक रामघाट परिसरातील वनस्पतीचे वैभव प्रकाशित करण्याचे कार्य केलेले आहे. नैसर्गिक रंगनिर्मिती आणि त्यांचा वस्त्रोद्योगात वापर करण्याच्या प्रक्रियेत त्यांनी कामगिरी करून वनस्पती विश्वातले अज्ञात पैलू आपल्या संशोधनपर निबंधातून समोर आणण्याबरोबर त्यांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी पर्यावरण जागृतीच्या उपक्रमात आपणाला जोडून घेतलेले आहे. निरामय आयुर्वेद व पंचकर्म केंद्राद्वारे गोवा-महाराष्ट्रात कार्यरत असणाऱया डॉ. नीलेश कोदे आणि डॉ. बाळकृष्ण गावडे यांनी सिंधुदुर्गाला लाभलेल्या श्रीमंत नैसर्गिक वारशाचे दर्शन ‘सिंधुदुर्गातील रानभाज्या’ या पुस्तकातून घडविण्याचे प्रयत्न केलेले आहेत. एकेकाळी सिंधुदुर्ग जिल्हय़ात समाविष्ट होणाऱया गावात जंगल, माळरान, पाणथळीच्या जागा येथे मोसमानुसार ज्या रानभाज्या उगवतात त्यांचे लोकमानसाला ज्ञान होते. त्यांच्यात कोणकोणते औषधी गुण आहेत यांचे शास्त्रीय ज्ञान त्यांना नसले तरी अनुभवाद्वारे त्यांना पौष्टिक आणि औषधी तत्त्वांची जाण होती आणि त्यामुळे कोणत्या भाज्या कधी खाता येतात आणि कधी खाऊ नयेत हे अधोरेखित करण्यासाठी त्यांनी अशा काही रानभाज्यांची सांगड लोकधर्म आणि उत्सवांशी पूर्वापार घातली होती. डॉ. बाळकृष्ण गावडे यांनी आपल्या वनस्पतीचे शास्त्र विद्यापीठात अभ्यासताना त्याला क्षेत्रीय संशोधन, निरीक्षणाची सांगड घातली आणि त्यामुळे गावोगावी लोकमानसाने जतन करून ठेवलेल्या नैसर्गिक वारशाचे ज्ञान नव्या पिढीसमोर सहजसोप्या भाषेत, रंगीत छायाचित्रे आणि पौष्टिक तसेच औषधी तत्त्वांचा अभ्यास करून ठेवणे त्यांना शक्य झालेले आहे.
यापूर्वी ‘औषधी रानभाज्या’ या पुस्तकाद्वारे डॉ. मधुकर बाचुळकर, डॉ. अशोक वाली आणि रणिता चौधरी यांनी कोल्हापूर आणि परिसरातला हा नैसर्गिक वारसा वाचकांसमोर आणला होता. आज ‘फास्ट आणि जंक फूड’चे प्राबल्य समाजात वाढत असताना रानभाज्यांच्या मोसमात त्या बाजारात दिसू लागलेल्या आहेत आणि त्यामुळे ग्रामीण जनतेच्या अर्थाजनात भर पडत असली तरी या रानभाज्यांच्या होणाऱया अतोनात वापरामुळे त्यांच्या प्रजाती लोप पावणार नाहीत ना ही भीती अनाठायी ठरणार नसल्याची चिन्हे दिसू लागली आहेत आणि त्यासाठी त्यांचा वापर डोळसपणे, संतुलित होईल, यासाठी डॉ. बाळकृष्ण गावडे आणि डॉ. नीलेश कोदे यांनी प्रयत्न आरंभलेले आहेत. आज भाज्यांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात रासायनिक खतांचा आणि द्रव्यांचा वापर होत असल्याने त्यांच्या नैसर्गिक गुणधर्मात बदल होऊन भाज्यांची चव आणि प्रतिकारक शक्ती कमी होत गेली. त्याचा दुष्परिणाम भाज्यांच्या पिकांवरती जाणवू लागलेला आहे. जिवाणू, विषाणू, बुरशी व कीटकजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात जाणवू लागल्याने चिंता व्यक्त केलेली आहे. पचनक्रियेतील बिघाड, बद्धकोष्ठता, मूळव्याध, पित्ताचा त्रास यासारख्या व्याधींतून मुक्तता मिळविण्यासाठी आहारात रानभाज्यांची नैसर्गिकता मौसमानुसार उगवतात आणि कोणत्याही कृत्रिम खतपाण्याशिवाय जंगलात वाढतात. या पुस्तकातून आयुर्वेदिक ग्रंथांचा संदर्भ पाहून संस्कृत भाषेतील श्लोकांच्या आधारे त्यांचे आयुर्वेदिक उपयोग व गुणधर्म, पारंपरिक पद्धतीद्वारे रानभाज्यांमधील पौष्टिकता सांगण्याचा प्रयत्न सफल झालेला आहे. रानभाज्या वनस्पती असल्याने त्यांची फळे, फुले, पाने, मूळ आणि ती वनस्पती कुठे मिळते, ती उगविण्याचा कालावधी कोणता ही माहिती देण्याबरोबर या रानभाज्यांच्या विविध पाककृतीदेखील सांगितलेल्या आहेत. आपल्या सभोवतालच्या निसर्गात मिळणाऱया रानभाज्यांचा परिचय करून द्यावा, त्यांची शास्त्रीय माहिती मिळावी आणि निसर्गात मिळणाऱया या वनस्पतीबाबत व त्यांच्या सेवनाने आपल्या शरीरावर होणारे परिणाम याबाबतचे कुतूहल वाचकात जागविण्याचा हेतू या पुस्तकाच्या वाचनाने सफल ठरणार आहे.
या पुस्तकात मोठा करमळ, गुळवेल, वाघाटी, मोठा दिंडा, रानमूग, कांचन, गारंबी, लाजाळू, गोमेटी, पेंढरा, गोजिभ, पाथरी, कुडा, सोनारवेल, फासवेल, खरशिंग, भारंगी, नरवेल, कुमारो, दुदुर्ली, पेवगा, शेंडवल, शतावरी अशा आज विस्मृतीत जाण्याच्या वाटेवर असलेल्या रानभाज्यांची माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर टाकळा, कुर्डू, घोळ, रानकेळ, अळू, कनक, चिवार, औदुंबर अशा आजसुद्धा उपयोग केल्या जाणाऱया रानभाज्यांसंदर्भात माहिती उपलब्ध करण्यात आलेली आहे. आज बाजारात मिळणारी चिटकी, वालपापडी, फ्लावर, कोबी, पालक अशी भाजी रासायनिक खते, द्रव्ये वापरून करत असली तरी सहजपणे पैसे देऊन या भाज्या मिळत असल्याने त्यांचा वापर प्रामुख्याने केला जातो. सण-उत्सवाच्याप्रसंगी काही भाज्या वापरणे बंधनकारक असल्याकारणाने ग्रामीण भागातील लोकमानसाचे नाते काही अंशी रानभाज्यांशी टिकून राहिलेले आहे. कणकवली येथील हळवळच्या वामन पंडित यांनी जंगलातला विस्मृतीच्या उंबरठय़ावरती असलेला वारसा प्रकाशात आणण्यासाठी जी धडपड आरंभलेली आहे त्याचा परिपाक म्हणून कोरोना काळात प्रकाशित झालेले हे माहितीपूर्ण पुस्तक आहे.
राजेंद्र पां. केरकर