कांपाल येथे मॅरेथॉन जनसुनावणीत गोंधळ जनसमुदायाने दोन तास काम रोखले : मंडपात फक्त दोनशे जणांनाच प्रवेश
प्रतिनिधी / पणजी
गोवा किनारी विभाग व्यवस्थापन आराखडय़ाला अंतिम स्वरुप देण्यासाठी कांपाल पणजी येथे काल गुरुवारी झालेल्या सुनावणीवेळी आयोजकांचे गैरव्यवस्थापनच अधिक दिसून आले. दक्षिण गोव्यातील सुनावणीला एक नियम व उत्तर गोव्याला वेगळा लावल्याने उपस्थित जनसमुदायाने गोंधळ घालून दोन तास कामकाज रोखले. बाजू मांडण्याचा हा फक्त फार्स असल्याचा आरोप अनेकांनी केला. आराखडय़ात किनाऱयावरील घरेच गायब झाल्याने आणि खाजन शेतीला खारफुटीचे जंगल दाखवल्याने अधिकतर जणांनी रोष व्यक्त केला. भल्या मोठय़ा मंडपात फक्त 200 जणांनाच प्रवेश देण्यात आला होता.
कांपाल येथील परेड मैदानावर सुमारे 2 हजार लोक सामावतील अशी व्यवस्था करण्यात आली होती, मात्र मंडपात प्रवेश देताना ज्यांनी आगावू नाव नोंदणी केली होती त्यांनाच प्रवेश देण्यात आला. नाव नोंदणीची पावती आणली नसल्याने अनेकांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली नाही. मंडपात फक्त 200 लोक दिसत होते. त्यांच्यासाठी जेवण सोडाच पिण्याच्या पाण्याचीही सोय करण्यात आली नव्हती.
कॅमेऱयाला ऐकवले गाऱहाणे
आराखडय़ा संबंधी बाजू ऐकून घेण्यासाठी चार वैज्ञानिक आले होते, त्या व्यतिरिक्त जिल्हाधिकाऱयांसह इतर अधिकारीही उपस्थित होते. पण बाजू ऐकण्यासाठी मंचावर एकही अधिकारी उपलब्ध नव्हता. गाऱहाणी मांडणाऱयाला पाठ करून काही अधिकारी खाली बसले होते, त्यांच्या समोर स्क्रीन होती, पण त्या स्क्रीनवर चित्रिकरण दर्शवले जात नव्हते. बाजू मांडणारी व्यक्ती फक्त कॅमेऱयाला आपले गाऱहाणे ऐकवत होती, असे चित्र दिसून आले.
दोन तास कामकाज रोखले
बाजू मांडण्यास उभे रहाण्यासाठी मंचची व्यवस्था नव्हती. माईकसाठी स्टँडही लावण्यात आला नव्हता. हातातील फाईल्स व दस्तावेज ठेवण्यासाठी टेबल किंवा पोडियमची व्यवस्था नव्हती. त्यामुळे एका हातात माईक सांभाळत दुसऱया हातात दस्तावेज पकडून बोलणे कठीण होणार असल्याचे जिल्हाधिकाऱयांच्या नजरेस आणून देण्यात आले. बराच गोंधळ घातल्यानंतर फक्त माईक स्टँडची व्यवस्था होऊ शकली.
उत्तरेत-दक्षिणेत वेगवेगळे नियम
दक्षिण गोव्यातील सुनावणीच्यावेळी ही व्यवस्था आहे, मात्र उत्तर गोव्यात का नाही. दक्षिण गोव्यात स्क्रीनवर चित्रिकरण दाखवले जाते, त्याप्रमाणे उत्तरेतही दाखवा, असा हट्ट धरून संपूर्ण जनसमुदाय उठून उभा राहिला व दोन तास कामकाज रोखून त्यांनी एकालाही बोलू दिले नाही. जिल्हाधिकारी अजित रॉय निर्वीकार राहिले. अतिरिक्त जिल्हाधिकारी पार्सेकर यांनी समुदायाला शांत करण्याचा प्रयत्न केला. शेवटी स्क्रीन सुरू झालीच नाही. ऍड. प्रसाद शहापूरकर यांनी निषेध व्यक्त करून अखेर बाजू मांडण्याच्या प्रक्रियेला परत प्रारंभ केला.
चेन्नईत बसून तयार केला आराखडा
किनारी आराखडा तयार करण्याचे काम चेन्नई येथील नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल कोस्टल झोन मेनेजमेंट (एनसीएससीएम) या संस्थेला देण्यात आले होते. या संस्थेचा एकही प्रतिनिधी किनारी भागाची पहाणी करण्यास आला नाही. गुगल मॅपच्या आधारे व 1971 चा नकाशा घेऊन चेन्नईत बसूनच हा किनारी आराखडा तयार करण्यात आला असून प्रत्येक पंचायतींनी 2019 मध्ये सादर केलेल्या आराखडय़ाला तिळमात्रही विचारात घेण्यात आले नसल्याचा आरोप या सुनावणीवेळी झाला.
खाजन शेती ऐवजी खारफुटीचे जंगल दाखविले
खारफुटीच्या झाडाच्या प्रमाणात भरमसाठ वाढ दर्शविण्यात आली आहे. हा भाग खारफुटीचे जंगल म्हणून ओळखला जणार असून तो वनखात्यांतर्गत घेण्यास हरकत मांडण्यात आली आहे. संपूर्ण गोव्यात एकूण 41.12 चौ. कि. मी. एवढे खारफुटीचे जंगल गणले जाते. त्यातील 33.93 चौ. कि. मी. उत्तर गोव्यात तर फक्त 7.17 चौ. मी. दक्षिण गोव्यात आहे. उत्तर गोव्यातील खारफुटीचे जंगल 5 चौ. कि. मी. पेक्षा जास्त नव्हते. ते अचानक 34 चौ. कि. मी. पर्यंत पोचण्याचे कारण म्हणजे खाजन शेतीत खारफुटीने अतिक्रमण केले असून खाजन शेतीचे प्रमाण कमी झाले आहे, अशी माहिती सुनावणीवेळी उघड झाली. त्यामुळे लोकांची खाजन शेतजमीन त्यांच्या हातून जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
गोव्याचे फार मोठे नुकसान होणार
खाजन शेतजमिनीचा उल्लेख नकाशावरून काढला गेल्यास गोव्याचे फार मोठे नुकसान होणार असून ही शेती म्हणजे गोव्यातील सर्वात जुनी हजारो वर्षापूर्वीची परंपरा आहे. बिल्डर लॉबी या जमिनीवर डोळा ठेवून आहे. कार्पोरेट कंपन्या व दिल्लीवासी लोकांनी खाजन शेती विकत घेण्याचा सपाटा लावला आहे. आपले लोकही आमिषांना बळी पडत आहेत, असा आरोप या वेळी झाला.
खाजन शेतीच्या दुर्दशेस मामलेदार जबाबदार
खाजन शेतीचे बांध मुद्दाम तोडून खारेपाणी आत घेतले जाते. खाजन शेती नष्ट केली जाते. मानसीचा लिलाव म्हणजे मोठा घोटाळा असून त्यात मामलेदार आणि जिल्हाधिकारी सामील असल्याचा आरोप झाला. खाजन जमिनी खारफूट जंगल म्हणून दर्शवण्याऐवजी खाजन शेत जमीन म्हणूनच त्याची आराखडय़ावर नोंद व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
समुद्र किनाऱयावरील घरे, झोपडय़ा गायब
समुद्र किनाऱयावरील घरांचा विषय सुनावणीतून वगळल्याने अनेकांनी निषेध व्यक्त केला. नव्या आराखडय़ात घरेच दाखवण्यात आलेली नाहीत. किती कायदेशीर घरे आणि किती बेकायदेशीर आहेत, त्याचा स्पष्ट उल्लेख या आराखडय़ात हवा, अशी मागणी करण्यात आली. दि. 6 जानेवारी 2011 पूर्वीच्या सर्व घरांना कायदेशीर स्वरुप देण्याचीही मागणी मांडण्यात आली. पारंपरिक मच्छिमारांची घरे, होडय़ा ठेवण्यासाठी त्यांनी बांधलेल्या झोपडय़ा नकाशात दर्शवल्या गेल्या पाहिजेत. समुद्र किनारी बेकायदेशीर बांधकामाना आलेला ऊत थांबवावा, अशी मागणी करण्यात आली.
समुद्रकिनाऱयाकडे जाणाऱया पारंपरिक वाटा गायब
समुद्र किनाऱयापर्यंत जाणाऱया पारंपरिक वाटा आराखडय़ातून गायब झाल्या आहेत. मच्छिमारी लोक शेकडो वर्षापासून या पाय वाटांचा वापर करीत आले आहेत. यापूर्वीच्या सर्व नकाशात त्यांचा उल्लेख आहे. आता या जमिनी माफियांनी गिळंकृत केल्या असून त्यांनी वाटा जबरदस्तीने बंद केल्या आहेत, आता त्या आराखडय़ातून गायब झाल्याचे मत अनेकांनी मांडले.
आमदार रोहन खंवटेंनी कान टोचले
सुनावणीसाठी आलेल्यांना मंडपात प्रवेश नाकरण्यात आला. ऑनलाईन 180 जणांनी नावे दिली होती. त्यांनाच संधी देण्यात आली. प्रत्येकाला फक्त 15 मिनीटे देण्यात आली. बाजू मांडताना उभे रहाण्यासाठी पोडियम नाही. बाजू ऐकण्यासाठी एकही व्यक्ती व्यासपीठावर नाही. चित्रिकरण होत आहे की नाही हे स्क्रीनवर दिसत नाही, अशा अनेक समस्यांवरून आमदार रोहन खंवटे यांनी जिल्हाधिकाऱयांना धारेवर धरले. शेवटी जिल्हाधिकाऱयांना नमते घेऊन व्यवस्था करणे भाग पडले.
चारही वैज्ञानिक दुपारी गायब
दुपारी जेवणासाठी एका मिनटाचीही विश्रांती देण्यात आली नाही. बाजू ऐकण्यासाठी कोण कोण आले आहेत त्यांची नावे उघड करा, असा हट्ट नागरिकांनी धरला. वैज्ञानिकांची नावे उघड करता येणार नाही, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगताच लोक अधिकच खवळले. वैज्ञानिक संदीप डोंगरे, महेश पाटील, सुंदर राजन, बालाजी हे चार अधिकारी हजर असल्याचे अखेर जिल्हाधिकाऱयांना जाहीर करावे लागले. पण हे चारही वैज्ञानिक दुपारी सुनावणी चालू असताना गायब झाले होते. जनसुनावणीत बाजू मांडण्यासाठी आलेल्यांमध्ये प्रामुख्याने आमदार रोहन खंवटे, काशिनाथ शेटय़े, प्रसाद शहापूरकर, माथायज साल्ढाणा, आना ग्रेसिएश, लोरेन्सो सिक्वेरा, तालुलाग डिसिल्वा, विक्टर फर्नांडिस, प्रसाद हरमलकर, क्लिफर्ड डिसोझा, आनंद गाड, थॉमस रॉड्रिग्ज, अमृत आगरवाडेकर, अमित मोरजकर, जोसेफ डिसोझा, झेलिया लोबो, रॉबर्ट फर्नांडिस, विराज गावकर आदींचा समावेश होता.