माजी महापौर मालोजी अष्टेकर यांचे प्रतिपादन : बॅ. नाथ पै. व्याख्यानमालेचे गुंफले पहिले पुष्प
प्रतिनिधी / बेळगाव
बॅ. नाथ पै यांचा जन्म जरी कोकणातला असला तरी त्यांचे बेळगाव विषयीचे योगदान विसरून चालणार नाही. केवळ कोकणचे खासदार म्हणून त्यांची ओळख नसून सीमाप्रश्नाचा प्रमुख नेता, उत्तम संसदपटू अशी त्यांची ओळख आहे. प्रत्येक विषय अभ्यासपूर्वक हाताळण्याच्या त्यांच्या शैलीमुळे विरोधकही त्यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा करत. लोकेच्छा जाणून केंद सरकारने सीमाप्रश्न सोडवावा, या मागणीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत ते आग्रही होते, असे प्रतिपादन माजी महापौर मालोजी अष्टेकर यांनी केले.
सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या 46 व्या व्याख्यानमालेला सोमवारपासून प्रारंभ झाला. गणपत गल्ली येथील वाचनालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफताना मालोजी अष्टेकर यांनी ‘बॅ. नाथ पै एक आठवण’ या विषयावर विचार मांडले. व्यासपीठावर वाचनालयाच्या अध्यक्षा सुनीता मोहिते, उपाध्यक्ष नेताजी जाधव, ऍड. मुचंडी उपस्थित होते.
नाथ पै यांचे बेळगावमध्ये शिक्षण झाल्यामुळे त्यांना येथील भाषिक, सामाजिक, आर्थिक प्रश्न माहीत होते. त्यांनी 1956 च्या साराबंदीच्या लढय़ात अग्रभागी राहून नेतृत्व केले होते. त्यासाठी त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. मुंबई येथे झालेल्या उपोषणामध्येही त्यांचे मोठे योगदान होते. संसदेत वेळोवेळी त्यांनी सीमाप्रश्नाविषयी आवाज उठवून त्यावर चर्चा घडवून आणली आहे. 1952 मध्ये इंग्लंड येथे बॅरिस्टरची पदवी घेत असताना त्यांनी बेळगावमधून निवडणूक लढविल्याची आठवण अष्टेकर यांनी व्यक्त केली.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व नाथ पै यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षा सुनीता मोहिते यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. वाचनालयाचे कार्यवाह रघुनाथ बांडगी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष नेताजी जाधव यांनी आभार मानले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.
पुरस्कारांचे वितरण
सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने देण्यात येणाऱया वाचनालयाच्या पत्रकार पुरस्काराचे सोमवारी वितरण करण्यात आले. मराठी विभागातून दैनिक रणझुंझारचे संपादक मनोहर कालकुंद्रीकर तर कन्नड विभागासाठी दैनिक कन्नडम्माचे वार्ताहर राजशेखर हिरेमठ यांना पुरस्कार देण्यात आला. तसेच प्रा. एस. आर. जोग महिला पत्रकार पुरस्कार मराठी विभागासाठी दैनिक स्वतंत्र प्रगतीच्या संपादिका बबिता राजेंद्र पोवार व कन्नड विभागासाठी बिग न्यूजच्या वार्ताहर भाग्यश्री सुणगार यांना देण्यात आला. तसेच सोनाली शिवराज पाटील व मारुती तुकाराम सुतार या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.
बाबुराव ठाकुरांमुळे मिळाली लिहिण्याची संधी
एम. ए. झाल्यानंतर कोणत्याही कार्यक्रमात ऐकत असताना त्यातील मुद्दे घेण्याची सवय होती. हीच सवय तरुण भारतचे संस्थापक कै. बाबुराव ठाकुर यांनी हेरली. सार्वजनिक वाचनालयाच्या व्याख्यानमालेचे रिपोर्टिंग करण्याचे काम त्यावषी मला मिळाले. त्यावेळी व्याख्यानाला ना. ग. गोरे, शांता शेळके, गो. नि. दांडेकर यासारखी मातब्बर मंडळी आली होती. दांडेकरांच्या व्याख्यानाचे वृत्तांकन दुसऱया दिवशीच्या तरुण भारतमध्ये अतिशय सुंदरपणे छापून आले. त्यामुळेच दांडेकरांनी दुसऱया दिवशी मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. ही माझ्यासाठी देण्यात आलेली सर्वोच्च पोचपावती असल्याची आठवण मालोजी अष्टेकर यांनी कथित केली.
नाथ पै व्याख्यानमालेत आज प्रा.सुहास कुलकर्णी यांचे व्याख्यान
बेळगाव : सार्वजनिक वाचनालयातर्फे सुरू असलेल्या बॅ. नाथ पै व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प चंदगडचे प्रा. सुहास कुलकर्णी गुंफणार आहेत. मंगळवार दि. 19 रोजी सायंकाळी 5.30 वा. सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात ते ज्ञानेश्वरीतील भक्तीमार्ग या विषयावर व्याख्यान देणार आहेत.
त्यांचा परिचय पुढीलप्रामणे-
प्रा. सुहास कुलकर्णी हे मूळचे जयसिंगपूरचे असून सध्या ते र. भा. माडखोलकर महाविद्यालय चंदगड येथे 1998 पासून मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. संत साहित्याचे अभ्यासक अशी त्यांची ओळख आहे. साहित्य संमेलने, कार्यशाळा, चर्चासत्रे यामध्ये त्यांचा सहभाग असतो. अनेक नियतकालिकांमधून त्यांनी लेखन केले आहे. शोधनिबंध, वक्तृत्व, निबंध लेखन, कथाकथन, एकांकिका स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून काम पाहतात.