वृत्तसंस्था / जबलपूर :
मध्यप्रदेशच्या जबलपूर येथील सैन्यासाठी शस्त्रास्त्र निर्मिती करणाऱया प्रकल्पात भारतीय वायुदलाची लढाऊ विमाने सुखोई आणि तेजससाठी ‘250 केजी एसएसएलडी बॉम्ब’ निर्माण करण्याचे काम सुरू होणार आहे. हे बॉम्ब मिळाल्याने वायुदलाच्या सामर्थ्यात मोठी भर पडणार आहे. सुमारे वर्षभरापूर्वी वायुदलाने ‘मेक इन इंडिया’ला चालना देण्यासाठी आयुध कारखान्यात बॉम्बनिर्मितीच्या प्रकल्पावर काम सुरू करण्यास सांगितले होते.
या केंद्राकडून बॉम्बच्या प्रतिकृती तयार करून वायुदलाला पाठविण्यात आल्या होत्या. त्यांची चाचणी यशस्वी ठरली आहे. या प्रतिकृतींचे सुखोई आणि तेजसमध्येही परीक्षण करण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालयाने आता ऑर्डिनेन्स फॅक्ट्री बोर्डाच्या माध्यमातून 250 केजी बॉम्बचे 300 नग निर्माण करण्यास सांगितले आहे. यासंबंधीचा आदेशही काढण्यात आला आहे. जबलपूर ऑर्डिनेन्स फॅक्ट्रीच्या प्रकल्पात या बॉम्बच्या निर्मितीची तयारी सुरू करण्यात आली आहे. 300 बॉम्ब निर्माण करण्याचा पहिला प्रकल्प यशस्वी ठरल्यास भविष्यात या बॉम्बच्या निर्मितीसाठी जबलपूर येथे स्वतंत्र प्रकल्प स्थापन करण्याचा विचार केला जाणार आहे.